सारोळा : राज्यभरातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. अनेक मातब्बरांना या निवडणुकीमध्ये अपयश आल्याचं आतापर्यंतच्या निकालावरून दिसत आहे.मतदारांनीही एक मताने सत्ता पलटू शकते हे दाखवून दिलं आहे. दोन ठिकाणी एका मताने दोन उमेदवारांचा पराभव झाल्याचं समोर आलं आहे. विजयी उमेदवार राष्ट्रवादीचे असून यामध्ये भोर तालुक्यामधील कासुर्डी गु. मा. गावातील अजय मालुसरे यांनी 1 मताने विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादीच्या अजय मालुसरे यांना 373 मते तर काँग्रेसच्या परशुराम मालुसरे यांना 372 मते मिळालीत. केवळ एका मताने सत्तापरिवर्तन पाहायला मिळाले आहे. परशुराम मालुसरे यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला आहे. या निकालाची सर्व तालुक्यामध्ये चर्चा आहे.निकाल समोर आल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले होते. आधी बाचाबाची झाली त्यानंतर गटातील समर्थक एकमेकांना भिडले. पोलीस स्टेशमनमध्ये तक्रारी करण्यात आल्या असून गावामध्ये तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी संघर्ष वाढू नये म्हणून कडकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान, भोर तालुक्यातील एकूण 54 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे त्या 23 ग्रामपंचायती कोणत्याही पक्षाच्या विचारांच्या म्हणता येणार नाही. कारण सर्व विचारांच्या आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एकमतानेच ती ठराविक ग्रामपंचायत बिनविरोध होत असते. तसेच 2 ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. एकूण 29 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक पार पडली.दरम्यान, ग्रामस्थांनीही निकालानंतर समाज माध्यमावर व्यक्त होताना काळजी घ्यावी. कोणाचं मन दुखावल जाईल अशा पोस्ट शेअर करू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.