लखनौ: कानपूर चकमकीमध्ये 8 पोलीस ठार झाल्यानंतर कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीकडून ब्राह्मणांची बदनामी केली जात असल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील मंत्री ब्रिजेश पाठक यांनी केला आहे. राज्य सरकारने कानपूर चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत.
मात्र ब्राह्मणांच्या नावे बनवण्यात आलेल्या सोशल मिडीयावरील बनावट अकाउंटच्या आधारे ब्राह्मणांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे पाठक यांनी आज पत्रकारांना सांगितले.
“कायदा हातात घेणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल आणि निरपराधांना कोणीही त्रास देऊ शकणार नाही. ही या सरकारची जबाबदारी आहे, असे पाठक म्हणाले.
भाजपला “ब्राह्मणविरोधी’ म्हणण्यापूर्वी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाने आत्मपरीक्षण करावे. भाजपला ब्राह्मण समाजाचा पहिल्यापासून पाठिंबा आहे. आजही ब्राह्मणांचा भाजपच्या सरकारलाच पाठिंबा अहे. केवळ नैराश्यापोटी अनावश्यक मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले.
केवळ एका व्यक्तीने केलेल्या गुन्ह्यांबद्दल संपूर्ण ब्राह्मण समाजाला जबाबदार धरले जाऊ नये, असे बसपा नेत्या मायावती यांनी विकास दुबे प्रकरणाच्या संदर्भाने ट्विट करताना म्हटले होते. ब्राह्मण समाजाला असुरक्षित वाटेल, असे काहीही करू नये, असा इशाराही मायावती यांनी राज्य सरकारला दिला होता.