दै. “प्रभात’, गांधी खादी भांडारतर्फे “नक्षत्रांचे गाणे’चे आयोजन, “सिंहगड इन्स्टिट्यूट’ सहप्रायोजक
पुणे – “का रे दुरावा, का रे अबोला’ “खोप्या मधी खोपा बाई’, “पाहिले न मी तुला’, “मन उधाण वाऱ्याचे’, “डौल मोराच्या मानंचा रं’, अशा एकापेक्षा एक सरस गीतांच्या स्वरसजावटीत सजलेली आणि भल्या पहाटे रंगलेली अस्सल मराठी गीतांची मैफल पुणेकर रसिकांना दीपावलीचा प्रत्यय देऊन गेली. निमित्त होते, दै. “प्रभात’ आणि गांधी खादी भांडार आयोजित, “सिंहगड इन्स्टिट्यूट’सहप्रायोजित “नक्षत्रांचे गाणे’ या कार्यक्रमाचे.
नामांकित गायिका उत्तरा केळकर, गायक जितेंद्र अभ्यंकर आणि आरती दीक्षित यांनी सुरेल आवाजात सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रतिष्ठेच्या रंगमंचावर झालेल्या या मैफिलीला शुक्रवारी पहाटे 6 वाजता प्रारंभ झाला.
पुण्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे, संगीतमय दिवाळी पहाट. गेली अनेक वर्षे दै. प्रभातच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या दिवाळी पहाटला यावर्षीही रसिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जितेंद्र अभ्यंकर यांनी “विठ्ठल नामाचा रे टाहो’ ही रचना सादर केली. या रचनेमुळे सभागृहातील वातावरण मंगलमय झाले. यासह त्यांनी सादर केलेल्या “गं साजणी’ आणि “पाहिले नं मी तुला’ या गीताला टाळ्या, शिट्ट्या आणि “वन्स मोअर’सह रसिकांनी विशेष दाद दिली. अभ्यंकर यांनी “हिरवा निसर्ग’, “सूर तेच छेडीता’ या गीतांनी मैफिलीला चार चॉंद लावले.
सत्तरच्या दशकांपासून मराठी आणि हिंदी संगीतसृष्टीमध्ये विशेष स्थान असणाऱ्या उत्तरा केळकर यांनी विविध गीते सादर करत रसिकांना “व्हर्सटाईल’ गायकीचा प्रत्यय दिला. त्यांनी गायनाची सुरुवात “स्वस्ति श्री गणेशनायका’ आणि “जय जय हे ओंकारा’ या भावगीतांनी केली. यानंतर त्यांनी सादर केलेल्या “प्रभाती सूर नभी रंगती’, “सेवा धर्मी पुण्य आहे’, “माझी रेणुका माऊली’ या गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या “का रे दुरावा, का रे अबोला’ या गीतामुळे मैफिलीला अनोखा साज चढला.
इतकेच नव्हे तर “तोचि खरा साधू, तोचि खरा संत’ आणि “येशील येशील राणी, पहाटे पहाटे येशील’ या अभ्यंकर आणि केळकर यांच्या “ड्यूएट’ गायनाने मैफिलीला अनोखी उंची प्राप्त झाली. तर केळकर यांच्या “चला जेजुरीला जाऊ’ या लावणीच्या बाजातील गीताला आणि त्याला अनुसरून सादर केलेल्या ढोलकीवादनाला रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. तर “राजा ललकारी अशी दे’, “अश्विनी ये ना’, “चिंब पावसाने रान झालं आबादानी’ या गीतांना रसिकांनी “वन्स मोअर’
दिला.
संगीत मैफिलीची सुरुवात आरती दीक्षित यांच्या “सेवा मानून घे आई’ या चरणाने झाली. त्यांनी “मेंदीच्या पानावर’, “मला वेड लागले प्रेमाचे’, “येऊ कशी प्रिया’ ही गीते सादर करत कार्यक्रम रंगतदार केला.
संकेत देहाडे, राजेश देहाडे, पद्माकर गुरव, हर्षद गनबोटे, ऋतुराज कोरे, मनोज गुरव या वाद्यवृंदाने साथसंगत केली. सूत्रसंचालक सिद्धार्थ बेंद्रे यांनी किस्से सांगत कार्यक्रमात रंगत आणली.
“मेड्ले’ला टाळ्या, शिट्ट्या आणि “वन्स मोअर’
उत्तरा केळकर यांनी त्यांच्या गाजलेल्या गाण्यांचा एक-एक अंतरा यावेळी सादर केला. या “मेड्ले’ला रसिकांनी अनोखी दाद दिली. “सत्यम शिवम सुंदरा’, “अशी चिक्क मोत्याची माळ’, “कुणीतरी येणार येणार गं’ या गीतांना रसिकांनी उचलून धरले. तर “बिलनची नागीण निघाली’ या गाण्याला तर रसिकांनी शिट्ट्यांसह “वन्स मोअर’ दिला.
आठवणींना उजाळा
दूरदर्शनसाठी बहिणाबाईंची गाणी वर्ष 1979 ला “रेकॉर्ड’ केली. बहिणाबाईंवर चित्रित होणाऱ्या लघुपटासाठी मला दोन गाणी गाण्याबाबत विचारण्यात आले होते. मी रेकॉर्डिंगसाठी आले, तेव्हा तेथे अनेक मान्यवर होते. रेकॉर्डिंग करण्यापूर्वी “तुझ्याकडे 14 गाणी येतील’ असे स्टुडिओमध्ये उपस्थित असणारे डॉ. काशिनाथ घाणेकर मला म्हणाले. त्यांचे हे वाक्य सत्यात उतरले आणि त्या लघुपटातील एकूण 16 गाणी मला गाता आली, अशी आठवण केळकर यांनी “खोप्या मधी खोपा बाई’ या गाण्याच्या निमित्ताने जागवली.