मुंबई : काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत शिवसेनेला सोडचिठ्ठी देणाऱ्या दीपाली सय्यद यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतलेल्या दिपाली सय्यद अजूनही वेटिंगवरच असल्याचे दिसत आहे. आजही त्यांचा शिंदे गटात प्रवेश झाला नाही. सलग तिसऱ्यांदा आज दिपाली सय्यद वेटींगवर आहेत. त्यामुळे आता त्यांच्या प्रवेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
तीन दिवसापूर्वी दिपाली सय्यद यांनी आज त्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचे म्हटले होते. मात्र तेव्हाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना भेटले नाहीत. सलग तिसऱ्यांदा आज दिपाली सय्यद यांना वेटींगवर ठेवण्यात आले आहे. अद्याप त्यांचा शिंदे गटात प्रवेश झालेला नाही. आज देखील आनंद आश्रम इथे प्रवेश होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, अचानक प्रवेश होणार नाही असे त्यांनी आता कळवले आहे. त्यामुळे सय्यद यांच्या प्रवेशावर आता प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील सलोख्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्या दीपाली सय्यद यांनी बुधुवारी अखेर शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेनेत आणले होते. त्यामुळे त्यांच्या पाठिशी उभं राहणं माझं कर्तव्य आहे, असं दीपाली सय्यद म्हणाल्या होत्या. यावेळी त्यांनी थेट रश्मी ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. मुंबई मनपातील खोके ‘मातोश्री’वर बंद होण्याची खंत रश्मी ठाकरेंना आहे. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे चिल्लर आहेत, सगळ्याच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत”, असा आरोप दीपाली सय्यद यांनी केला होता.
तसेच “माझा शिंदे गटात प्रवेश होत आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले आहे. प्रवेशासंदर्भात कसं, काय, कधी ही चर्चा करण्यासाठी भेट होणार आहे. मला शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती स्वीकारेन. मला शिंदे यांनी राजकारणात आणले. म्हणून त्यांच्यासोबत जाते आहे. मातोश्रीवर पोहोचणारे खोके कमी झाले म्हणून रश्मी वहिनी नाराज आहेत. मी शिंद-ठाकरे गट एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला, पण यश नाही आले म्हणून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते .