मुंबई – राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही युतीबाबत चर्चा सुरू होत्या, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला. तसेच राणे कुटुंबीयांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे ही युती पुढे होऊ शकली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. दीपक केसरकर म्हणाले, नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली. राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात मोठा वाटा होता. भाजपचे व्यासपीठ वापरून राणेंनी ठाकरेंची बदनामी केली.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यासोबत संपर्क केला. मी पंतप्रधानांना याबाबत वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यावर पंतप्रधानांच्या मनात स्व. बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबाबत प्रेम आणि आदर असल्याचे दिसून आले. हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संवाद सुरु झाला. यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव यांची भेट झाली. आदित्य ठाकरेंची बदनामी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करायचे ठरवले होते. पण नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्याने ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले, असेही केसरकरांनी सांगितले.
आम्ही आसामला निघून गेल्यानंतरही आम्ही आमच्या प्रतिनिधीला उद्धव ठाकरेंशी बोलणी करायला पाठवले होते. आमच्या प्रतिनिधींना उद्धव ठाकरेंनी सांगितले होते की, झालेले विसरून जाऊ. आपण एकत्र येण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा. आम्ही आघाडी तयार करायला तयार आहोत. मात्र यासाठी भाजपा पक्ष तयार नव्हता. तसेच आम्ही आसाममधील आमदारही तयार नव्हतो, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.