मुंबई : पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या दोन्ही जागांवर बिनविरोध निवडणूक व्हावी, असा प्रयत्न भाजपा, शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यासाठी शिंदे गट-भाजपाने विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा सुरू केल्याचे म्हटले जात आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. तर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“निवडणूक बिनविरोध व्हायला हवी. ती महाराष्ट्राची परंपरा आहे. पूर्वी ती खंडित झाली होती. तेव्हा शरद पवार यांनी स्वत: पुढाकार घेऊन ती परंपरा पुन्हा सुरू केली होती. शरद पवार हे सर्वांचेच नेते आहेत. त्यामुळे यावेळीही ते ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतील, अशी मला खात्री आहे,” असे दीपक केसरकर म्हणाले.
“विधान रिषदेच्या निकालामुळे हुरळून जाण्याची गरज नाही. कारण या निकालाचा अभ्यास मी स्वत: केला आहे. अमरावतीला आम्हाला धक्का बसला. तेथे साडेचार हजार मते बाद झाली. मराठवाड्यात आमच्या शिक्षण संस्था नाहीत. त्यामुळे औरंगाबादची जागा अनेक वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे राहिलेली आहे. कोकणच्या जनतेने बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेल्या लोकांना धडा शिकवला. त्यामुळेच या जागेवर आमचा उमेदवार एतकर्फी निवडून आला. कोकणात शिवसेनेचे मूळ आहे,” असे दीपक केसरकर म्हणाले.