संगमनेर – यावर्षी झालेल्या धुवॉंधार पावसाने व परतीचा पावसामुळे संगमनेर तालुक्यातील उसाला तोडणीपूर्वीच तुरे आले असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यातच गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने उर्वरित उसालाही तुरे फुटण्यास सुरुवात झाली आहे. उसाला तुरे आल्यामुळे वजनात घट होणार असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
यंदा गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत सरासरी पावसात वाढ झाली. तसेच पावसाळ्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर परतीच्या पावसाचा मुक्कामही लांबला. त्यातच यावेळी गळीत हंगाम सुरू करण्यास उशीर झाला. गळितासाठी यंदा जाणाऱ्या उसाला 18 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात उसाला तोडणीपूर्वी तुरे फुटले आहेत. विशेषत: आडसाली उसाला तुरे फुटलेले आहेत. त्याचबरोबर खोडव्याच्या उसालाही तुरा फुटू लागले आहेत. यापूर्वी काही ठरावीक जातीच्या उसाला तुरे फुटत होते.
तुरे फुटल्याने वजनात होणारी घट व उसाच्या वाड्याचा वैरणीसाठी वापर होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या उत्पादनात घट होतेच, त्याचबरोबर जनावरांच्या वैरणीचा प्रश्नही गंभीर बनला आहे.उसाच्या काही वाणांना ठराविक दिवसांनंतर तुरे फुटत असल्याने शेतकऱ्यांनी उसाचे नवीन वाण वापरण्यास सुरुवात केली होती.
पाण्याचे जास्त प्रमाण असणाऱ्या शेतात तुऱ्याचे प्रमाण जास्त येत होते. मात्र यावर्षी अतिपावसाने सर्व जातीच्या उसाला तुरे फुटले आहेत. काही ठराविक उसाच्या जाती त्यास अपवाद ठरल्या आहेत. मात्र येत्या 10 ते 15 दिवसांत त्या उसालाही तुरा फुटेल, अशी शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. भविष्यात अशा अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.