आतापर्यंत 212 हेक्टरसाठी पाणी मागणी : यंदा चार आवर्तनांची शक्यता
अकोले – ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भूजलस्तरात कमालीची वाढ झाल्याने अकोले तालुक्यातील देवठाणच्या आढळा धरणांतर्गत असणाऱ्या लाभक्षेत्राची पाणी मागणी यंदा घटली आहे. रब्बी हंगामाची आणि शेतातली उभे पिके मिळून रब्बी हंगामासाठी आजपर्यंत केवळ 212 हेक्टर क्षेत्राची पाणी मागणी झाली.
19 डिसेंबरपासून धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांतर्गत क्षेत्रासाठी आगामी आवर्तनाचे पाणी मागणी अर्ज सुरु झाले. एकूण 3 हजार 914 हेक्टर क्षेत्रापैकी अवघी 212 हेक्टर क्षेत्राची मागणी झाली. उजवा आणि डाव्या कालव्यासाठी अनुक्रमे 32 आणि 182 हेक्टर क्षेत्राने पाणी मागणी केली आहे. गेल्यावर्षीच्या पावसाळा मोठा झाल्याने अनेक दिवस नदी वाहती होती.
गावा शिवारातले छोटे-मोठे बंधारे आजही तुडूंब असून ओढे-नाले वाहते आहेत. शिवारातील विहीरींमध्येही मुबलक पाणीसाठा असल्याने या पाण्यावरच रब्बीची पिके उभारली आहेत. रब्बी हंगामाची कांदा, गहू, हरबरा, भाजीपाला, ऊस या पिकांची लागवड शेवटच्या टप्प्यात असली तरी धरणाची पाणी मागणी अजूनही काही दिवस होणारच नाही, असे चित्र दिसत आहे.
गेल्यावर्षी 1 हजार 500 हेक्टरच्या दरम्यान पाणी मागणी झाली होती. यावर्षी पाणी मागणी अर्जच येत नसल्याने मागणीक्षेत्रात मोठी घट संभवते. रब्बी हंगामासाठी दोन आणि उन्हाळी दोन अशी चार आवर्तने यावर्षी नक्की होतील अशी माहिती जलसंपदा खात्याच्या सूत्रांनी दिली. 1060 दलघफू पाणीक्षमतेच्या आढळा धरणात आजचा पाणीसाठा 1025 दलघफू इतका आहे. दरवर्षी पाण्याच्या तुटवड्याने नोव्हेंबरपासूनच पाणीमागणी सुरु होत असते.
आढळेच्या कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात आमदार डॉ. किरण लहामटे आणि जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून रब्बी आवर्तनाचा निर्णय घेण्यात येईल. यावर्षी आढळेची चार आवर्तने नक्की होतील.
अभिषेक पवार जलसंपदा खाते