लॉकडाऊनमुळे काहीसे नकारात्मक बनलेल्या वातावरणात काही सकारात्मक गोष्टीही
पुणे – लॉकडाऊनमुळे शहरातील वातावरण काहीसे नकारात्मक बनले असले, तरी यामुळे काही सकारात्मक गोष्टीही घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रदूषण स्थिती सुधारण्यापाठोपाठ आता शहरातील कचरा निर्मितीही घटली आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार शहरातील कचरानिर्मिती ही सुमारे 1500 मेट्रिक टनने घटली असून प्रामुख्याने हॉटेल व्यवसाय बंद असल्याने हा बदल झाला असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे शहरातील खाद्यव्यवसाय बंद असल्याने त्यामध्ये उपयोग केल्या जाणाऱ्या भाज्यांचा वापर कमी झाला आहे. तर विविध प्रकारच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, विविध समारंभ यासारख्या गोष्टी बंद असल्याने प्लॅस्टिक, सजावटीच्या वस्तू तसेच अन्य वस्तू ज्यामुळे सुका कचरानिर्मिती होते, त्यांचा वापरही घटला आहे. त्यामुळेच ज्याठिकाणी सर्वसामान्यपणे 2100 मेट्रिक टन प्रतिदिन इतकी कचरा निर्मिती होत होती, ती सध्या 500 ते 600 मेट्रिक टन प्रतिदिन इतकी कमी झाली आहे. म्हणजेच सुमारे 1500 मेट्रिक टनची घट झाली आहे.
याबाबत महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक म्हणाले, “शहरातील कचरानिर्मितीचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. यामध्ये हॉटेल्स व्यवसाय बंद असल्याने सर्वाधिक परिणाम झाला आहे. तसेच, रहिवासी भागातून निर्माण होणाऱ्या कचरा हा त्या त्या सोसायटीतच जिरवला जाईल यासाठी महापालिका प्रयत्न करत असून त्यासाठी विशेष सवलत देण्याचेही आमचे प्रयत्न सुरू आहेत.’
कचरावेचकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर
लॉकडाऊन काळात एकीकडे घरोघरी जाऊन कचरा वेचणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, कचरावेचक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, दुसरीकडे केलेल्या कचऱ्याचे करायचे काय? त्या कचऱ्यापासून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने शहरातील शेकडो कचरा वेचकांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असल्याचे “स्वच्छ’ या स्वच्छताविषयक काम करणाऱ्या संस्थेच्या आऊटरीच अधिकारी सूचिमिता पै यांनी सांगितले.
बोर्डाच्या हद्दीत कचरानिर्मितीत निम्म्याने घट
लॉकडाऊनमुळे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरानिर्मिती निम्म्यावर आली आहे. बोर्डाच्या आठ वार्डांमधून सामान्यपणे प्रतिदिवस पन्नास टन इतकी कचरानिर्मिती होते, मात्र सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हे प्रमाण 25 ते 30 टन इतके झाल्याची नोंद बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून नोंदवली आहे. लष्कर परिसरात असणाऱ्या एम.जी. रोड त्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी मार्केट, सेंट्रल स्ट्रीट या भागांत हॉटेल्स आणि भाजी मार्केट असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा साठत होता. मात्र, सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे या भागातील सर्व हॉटेल्स भाजीपाला मार्केट बंद केली आहेत. यामुळे कचऱ्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.
लॉकडाऊनमुळे निदर्शनास आलेल्या महत्त्वाच्या बाबी
– हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रेते आणि भाजीपाला मार्केट हे कचऱ्याचे मोठे स्रोत.
– घरांमध्ये सध्या कडधान्याची भाजी करण्यावर भर दिला जात असल्याने ओला कचरा निर्मितीत घट.
– नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाची सवय लागण्यास मोठा हातभार.
– नागरिकांकडून कचरा पुनर्वापराबाबत (रिसायकलिंग) होताहेत प्रयत्न.