पुणे – राज्यात थंडीची चाहुल लागल्यानंतर अनेक भागांत दाट धुके आणि दव पडत आहे. मुख्यत: निरभ्र आकाशामुळे दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे तर, रात्रीच्या तापमानात घट होत आहे.
राज्यात गुरुवारी सर्वांत कमी तापमान हे नगर येथे 12.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. याशिवाय पुण्यातही किमान तापमानाचा पारा घसरला असून 15 अंशापर्यंत ते खाली आले आहे. तापमानात चढ-उतार सुरू असून कमाल तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात दोन ते तीन अंशानी घट होत आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचे चटके तर, रात्री गारठा पडत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आगामी काळात राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 20 अंशापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.