गोंदवले – आमदार जयकुमार गोरे यांच्या नौटंकीमुळे माण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराच्या मताधिक्यात घट झाली, असा दावा माणचे नेते शेखर गोरे यांनी केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक- निंबाळकर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चारीमुंड्या चीत करत मोठ्या मताधिक्याने निवडून आले. माळशिरसबरोबरच माणनेही या विजयात महत्वाची भूमिका बजावलीे. माण विधानसभा मतदारसंघातून आमच्या गटाने अगदी पहिल्यापासून तळागाळापर्यंत जाऊन प्रचार केला.
गण, गटनिहाय प्रचार गाड्या लावून गावे वाड्यावस्त्यांवर गाठीभेटी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला मदत करा, आपल्या दुष्काळी तालुक्यातील सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी महायुतीला मदत करा, असे आवाहन करत प्रचार यंत्रणा राबवली होती. आम्ही प्रामाणिकपणे केलेले कार्य जनतेला व वरिष्ठांना माहिती आहे. झंकी, नौटंकी करण्याची सवय आम्हाला नाही. आपले काम करत राहायचे असे मला वाटते. त्यामुळे आम्ही श्रेय घेण्याच्या प्रयत्नात पडत नाही, असे सांगून श्री, गोरे म्हणाले, “”मात्र आमदार जयकुमार गोरे यांनी आघाडीत बिघाडी करत भाजपच्या उमेदवाराला मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना जाहीर व्यासपीठावरून करूनही त्यांच्या बहुतांश नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी त्यांचे न ऐकता त्यांच्या निर्णयाला विरोध करत आघाडी धर्म पाळल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांची मते राष्ट्रवादीच्या उमेदवाराला गेली. मात्र तरीही आमदार महोदय नेहमीप्रमाणे मीच केलं हे दाखवत मिरवत आहेत.” त्यांच्या अशा नौटंकीमुळेच माण मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराच्या मताधिक्यात घट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माढा मतदारसंघात माणमधून भाजपला 96 हजार 476 मते मिळाली तर राष्ट्रवादीला 73 हजार 261 मते मिळाली. यात राष्ट्रवादीची मते किती हा संशोधनाचा विषय असताना ती आपल्याच नेतृत्वाखाली मिळाली आहेत असे समजून काहीजण तोऱ्यात आहेत. त्यात निम्म्याच्यावर कॉंग्रेसची मते आहेत. आमदार गोरेंच्या निर्णयाविरोधात त्यांची लोकं गेली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदारांच्या लोकांनी कामे न केल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचे मताधिक्य घटले. आमदारांचे त्यांच्या लोकांनी न ऐकल्यामुळे राष्ट्रवादीची मते वाढली. जर आमदारांच्याकडून आमच्याप्रमाणे तळागाळापर्यंत जावून प्रचार झाला असता तर माळशिरसप्रमाणे माणमधूनही मताधिक्य मिळाले असते.
राष्ट्रवादीला मिळालेली मते ही तुमची एकट्याची नाहीत. तुमची मते विधानसभेला दाखवा, असे आवाहनही गोरे यांनी केले.
राष्ट्रवादीच्या बांडगुळांनी विधानसभेच्या रिंगणात तुमची ताकद दाखवा. दोनचार पुड्या बांधणारी बरोबर ठेवून राजकारण करणाऱ्यांनी उसणे अवसान घेऊ नय, अशी टीका त्यांनी केली. माण तालुक्यातील एक ग्रामपंचायत घेता येत नाही त्या बांडगुळासाठी पवारांनी माढ्याची हक्काची सीट घालवली. जातीयवादाचे विष पेरणाऱ्या त्या बांडगुळांवर नक्की कशाच प्रेम आहे ते जनतेला कळू द्या.आम्हाला डावलल्यामुळे राष्ट्रवादीला हक्काची माढ्याची सीट घालवावी लागली,, असा दावाही त्यांनी केला.