नवी दिल्ली – देशात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. करोनाचा सर्वाधित फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य विभागाने सादर केलेल्या आकडेवारीवरून महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. आठवड्याच्या संख्येच्या आधारावर गेल्या तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रातील ऍक्टिव्ह केसेसमध्ये 7 टक्क्यांची घट झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.
याबाबत त्यांनी आरोग्य विभागाच्या आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. देशात सध्या करोनाच्या चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आतापर्यंत देशात 4 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये 11 लाख 72 हजार चाचण्या करण्यात आल्या. तर आतापर्यंत करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्याही वाढून 29 लाख 70 हजारांवर पोहोचली आहे. सध्या पाच राज्यांमध्ये ऍक्टिव्ह केसेसची संख्या अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात मिळून एकूण ऍक्टिव्ह केसेसच्या 62 टक्के केसेस आहेत. तसेच आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात या राज्यांमध्येच एकूण मृत्यूंच्या 70 टक्के मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.