तहसीलदार मधुसूदन बर्गे : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती
वडगाव मावळ (प्रतिनिधी) – लोकशाहीचा आत्मा या निवडणुका असून, योग्य लोकप्रतिनिधी निवडणे हा मतदारांचा अधिकार आहे. कुटुंबातील 18 वर्ष वय पूर्ण असलेल्या तरुण व तरुणीचे नाव मतदार यादी नोंदवा. देश हितासाठी मतदाराच जबाबदार असतो. ग्रामपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत मतदान टक्का 92 असतो, तोच विधानसभा व लोकसभा निवडणुकीत 62 टक्के मतदान ही चिंतेची बाब आहे.
प्रत्येक तरुण व तरुणींनी आपल्या परिसरातील नवमतदार व मतदान करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. दिवसेंदिवस मतदानाचा टक्का कमी होत असून, शंभर टक्के मतदान होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले. येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व बीबीए, डीएड् व बीएड् महाविद्यालयामध्ये शनिवारी (दि. 25) रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, निवडणूक नायब तहसीलदार आर. एल. कांबळे, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक शिला खोत, प्रा. महादेव वाघमारे, प्रा. महादेव सांगळे, मंडलाधिकारी संदीप बोरकर, तलाठी सुनीता पेरके, राहुल लोंढे, प्रा. अनिता धायगुडे, प्रा. संध्या थोरात यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सृष्टी मराठे आदींनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मावळ तहसील कार्यालयापासून ते वडगाव शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. निवडणूक नायब तहसीलदार आर. एल. कांबळे यांनी मतदार शपथ दिली. मतदार जनजागृती निमित्त निबंध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, वेशभूषा, काव्यवाचन, हस्ताक्षर आदी स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र डोके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मनोज गायकवाड यांनी केले. मंडलाधिकारी संदीप बोरकर यांनी आभार मानले.