नवी दिल्ली – उत्सवाचे वातावरण असताना सप्टेंबर महिन्यामध्ये वितरकाकडून ग्राहकांनी खरेदी केलेल्या वाहन विक्रीत घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मात्र उत्सवाच्या काळात ही झीज भरून निघेल अशी आशा बऱ्याच वितरकांनी व्यक्त केली.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेने म्हटले आहे की, सप्टेंबर मधील विक्री 12,96,257 युनिट इतकी झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये करोना धुमाकूळ घालत असूनही 13,68,307 युनिट एवढ्या वाहनांची विक्री झाली होती.
दुचाकी आणि ट्रॅक्टर विक्रीत घट झाली असली तरी प्रवासी वाहन, व्यवसायिक वाहन आणि तीन चाकी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. संघटनेने म्हटले आहे की, यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये 9,14, 621 एवढ्या दुचाकींची विक्री झाली. गेल्या वर्षी 10,33,895 एवढ्या वाहनांची विक्री झाली होती.
सप्टेंबर महिन्यामध्ये ट्रॅक्टर विक्री 24 टक्क्यांनी कमी होऊन 52,896 इतकी झाली आहे. प्रवासी वाहन विक्रीत मात्र 16 टक्क्यांची वाढ होऊन सप्टेंबर महिन्यामध्ये 2,33,308 प्रवासी वाहने विकली गेली. सप्टेंबर महिन्यामध्ये व्यवसायिक वाहनांची विक्री 47 टक्क्यांनी वाढून 58,820 इतकी झाली आहे. तीन चाकी वाहनांच्या विक्रीत 50 टक्क्यांची वाढ होऊन 36,612 वाहने विकली गेली.
या संघटनेचे अध्यक्ष रिंकेश गुलाटी यांनी सांगितले की, दुचाकी वाहन विक्री वाढत नसल्यामुळे वितरकाकडे 35 दिवस पुरेल एवढा वाहन साठा निर्माण झाला आहे. 150 सीसी वाहनांची कमतरता आहे कारण त्यामध्ये सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. सध्या वाहन कंपन्यांना सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहे. तीन चाकी वाहने मात्र मंदीच्या गर्तेतून बाहेर आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजपासून उत्सवाचा काळ सुरु झाला आहे.
त्यामुळे या आठवड्यामध्ये कशी परिस्थिती आढळून येते यावर पुढील बाबी अवलंबून आहेत. एकीकडे करोनाचे निर्बंध कमी होत असतानाच दुसरीकडे इंधनाचे दर मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि खेड्यातील लोक वाहन घेण्यास कचरत आहेत.