गांधीनगर – भारतीय समाजात शिक्षण, सामाजिक जाणिवांची वाढ आणि समृद्धीमुळे मोठी जागृकता निर्माण झाली असून त्यातून भारताची लोकसंख्या कमी होत आहे असा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. गुजरातमधील एका कार्यक्रमात,त्यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, आपल्या स्वातंत्र्यानंतर, भारताने आपल्या लोकसंख्येच्या संरचनेत खूप मोठे बदल पाहिले आहेत. हे बदल लोकसंख्येच्या विस्फोटातून घडले आहेत. परंतु जीवनमान सुधारणे, कौशल्य आणि प्रशिक्षण प्राप्त होणे आणि रोजगार निर्मिती या दृष्टीने व्यापक प्रयत्न जारी असले तरी लोकसंख्येच्या प्रचंड प्रमाणामुळे त्याचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
भारत सन 2023 पर्यंत चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भारतामध्ये सध्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.5 टक्के लोकसंख्या आहे.
भारतातील लोकसंख्येचा हा आकडा सन 2030 पर्यंत 150 कोटी आणि 2050 पर्यंत 166 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. जबरदस्तीने लोकसंख्या नियंत्रणाचे अत्यंत धोकादायक परिणाम होऊ शकतात, त्यामुळे लिंग असंतुलन निर्माण होऊ शकते, असे जयशंकर म्हणाले.