पुणे – सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना बेळगाव पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले होते. या घटनेचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र निषेध करत बेळगावला भेट दिली. दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकारण तापत असतानाच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतील सत्कारप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले कि, कर्नाटक सीमा ही पाकिस्तानची सीमा नव्हे. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी तो प्रश्न धगधगता ठेवू नये. राममंदिर प्रश्नासारखा तो प्रश्न सोडवावा अथवा हा संबंध भाग स्वतंत्र घोषित करावा, असे त्यांनी म्हंटले आहे. सबनीस यांच्या वक्तव्यामुळे नवे वादंग उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर शिवसेना ता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना धक्काबुक्की या प्रकरणाआधीही कर्नाटकातल्या खानापूर तालुक्यातील इदलहौंगमध्ये गुंफन मराठी साहित्य संमेलन आयोजीत करण्यात आले होते. मात्र, सीमाभागात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांना गावबंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन सीमा भागात हिंसाचार उफाळून आला होता. कनसेकडून महाराष्ट्रातून बेळगावात जाणाऱ्या बसेस फोडण्यात आल्या. तर, मराठी पाट्यांचीही तोडफोड करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालण्याची भाषा कनसेच्या नेत्याने केली होती. अशाप्रकारे कानडी सरकारकडून मराठी भाषिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.