पुणे : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्यात आले होते. आता इयत्ता पहिली ते अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याने शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून राज्य शासनाकडे करण्यात येवू लागली आहे.
शालेय शिक्षण विभागाने 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करुन ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य दिले होते. शिक्षकांनी अनेक संकटांचा सामना करत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याला महत्व देत शालेय परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता शैक्षणिक सत्रही संपल्यासारखेच आहे. परंतु शासनाने उन्हाळी सुट्टीसंदर्भात आजून तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
विद्यार्थ्यांना दरवर्षी 30 एप्रिलपासून आणि शिक्षकांना 1 मे रोजीचा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा केल्यानंतर 2 मे ते 15 जून अशी उन्हाळी सुट्टी जाहीर केली जाते. यंदा शासनाकडून सुट्टी बाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना सुट्टी मिळणार की नाही याबाबत विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शाळांना दीर्घ सुट्टी जाहीर करण्याचा स्वतंत्र अधिकार नाही. सलग ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही होण्याची शक्यता आहे. सुट्टीच्या निर्णयामुळे राज्यात सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात एकसूत्रता राहील हे लक्षात घेऊन सरकारने उन्हाळी सुट्टीचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी शिक्षक संघटना करत आहेत. याबाबतची निवदने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविण्यात येत आहेत.