नगर -मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नूकसानींचे तातडीने पंचनामे करुन, शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी, मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. ग्रामीण भागात शेती पिकांसह, फळबागा, घरांची पडझड आणि दगावलेल्या जनावरांचे गांभीर्य लक्षात घेवून, महसुल आणि कृषि विभागाने वस्तुनिष्ठ पंचनामे करुन तातडीने मदतीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सुचनाही त्यांनी आधिकाऱ्यांना दिल्या.
सलग दोन दिवस जिल्ह्यात वादळी वारे आणि पूर्व मोसमी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने ऊस शेती, डांळीब बागा, घास शेती, काढणीसाठी आलेला आंबा जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. भाजीपाल्याची पीक जमीनदोस्त झाली असुन, कांदा चाळीत साठविलेला कांदा पावसाने भिजल्याने शेतकऱ्यांना दुहेरी नूकसानीचा सामना करावा लागला आहे. यासंदर्भात आ.विखे यांनी महसुल व कृषि विभागातील वरिष्ठ आधिकाऱ्यांशी संपर्क साधुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली.
तसेच नूकसान झालेल्या पिकांचे, फळबागांचे वस्तुनिष्ठ पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने एकत्रितपणे करावेत असे, सुचित करुन, तातडीने मदतीचे प्रस्ताव पाठविण्याचा सूचना त्यानी प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यासह शिर्डी मतदार संघातही वाकडी, नपावाडी, कोऱ्हाळे या गावात जनावरे जखमी होवून दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
घरांची झालेली पडझड शाळा खोल्यांचे उडालेले पत्रे, जनावरांचे गोठे, पोल्ट्री शेड व शेडनेट पॉलिहॉऊसच्या झालेल्या नुकसानीचे गांभीर्य ओळखून तातडीने दुरुस्तीबाबत प्रशासनाने सहकार्य करण्याची मागण त्यांनी केली. सध्या गोदावरी आणि प्रवरा पात्रात पाण्याचे आवर्तन सूरू आहे. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची गरज लक्षात घेवून, खंडीत झालेला वीज प्रवाह पुन्हा सुरळीत होणे गरजेचे असल्याने वादळी वाऱ्याने उखडून पडलेले वीजेचे खांब, आणि जळालेले रोहीत्र पुन्हा नव्याने बसवून देण्याबाबत वीज वितरण कंपनीने यंत्रना कार्यान्वित करावी.
आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतीमाल कवडीमोल भावाने विकावा लागला. विक्रीची व्यवस्था न झाल्यामुळे शेतीमाल फेकूनही द्यावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाच्या संकटामुळेही शेतकरी आता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांसमोर उभ्या राहीलेल्या या आव्हानात्मक परिस्थितीचा विचार करुन शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याची गरज आहे.
ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे