मुंबई – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने कॅबिनेटची बैठक बोलावून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करा, अशी मागणी भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
खासदार संभाजीराजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीत संभाजीराजे यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीची माहिती दिली.
संभाजीराजे म्हणाले, मराठवाड्यात शेतकऱ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही या भागाची पाहणी केली आहे. त्यांनाही शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर कॅबिनेटची बैठक बोलावून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
ओला दुष्काळ जाहीर केल्यास राज्याला केंद्राचे आणि राज्याचे म्हणून दोन्ही फायदे मिळू शकतात. त्यामुळे “एनडीआरएफ’मधून आपण कर्जही घेऊ शकतो. करोनाच्या काळात कर्ज घ्यावे की घेऊ नये, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण शेतकरी जगावयाचा असेल तर कर्ज घेतलेच पाहिजे.
आतापर्यंत 80-90 टक्के पंचनामे झाले आहेत. आज रात्रीपर्यंत सर्व पंचनामे सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहितीही संभाजीराजे यांनी दिली.