नवी दिल्ली: शिवसेनेच्या खासदारांनी आज संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सभागृहात आक्रमक पवित्रा घेत आपला मराठी बाणा सरकारला दाखवून दिला. राज्यात आलेल्या अवकाळी पावसाने तेथे प्रचंड नुकसान झाले असून ही आपत्ती सरकारने नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संसद भवनाबाहेर शिवसेना खासदारांनी ही निदर्शने केली. त्यावेळी या पक्षाचे राज्यसभेतील नेते संजय राऊत, लोकसभेतील सदस्य अरविंद सावंत यांच्यासह सर्व शिवसेना खासदार उपस्थित होते. राज्यातील अवकाळी पावसाने 70 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा फटका राज्यातील 36 पैकी 30 जिल्ह्यांना बसला आहे. नुकसानीचा अंदाज पाच हजार कोटी रूपयांच्या घरात आहे असे राज्य सरकारने अधिकृतपणे नमूद केले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे.