मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या मतदानानंतर विविध वाहिन्यांनी जाहिर केलेल्या एक्झिटपोलने कॉंग्रेस बिथरली आहे. त्यामुळे ज्या वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत त्यांनी मतदारसंघनिहाय व बुथ निहाय निकाल जाहीर करावेत. वस्तुस्थिती जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सोमवारी विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर वृत्त वाहिन्यांनी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याबाबत कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच एक्झिट पोल जाहीर करण्याची स्पर्धा वृत्तवाहिन्यांमध्ये लागली होती.
मतदान केंद्रावर मतदार रांगेत उभे असतानाच सायंकाळी 6 वाजता वाहिन्यांनी अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली. विविध वाहिन्यांनी जाहीर केलेले आकडे वस्तुस्थितीदर्शक नसल्याने जनतेच्या मनात याबाबत प्रचंड रोष आहे. त्यातच काही वाहिन्यांचे मतदारसंघातील अंदाज हे जनतेला गुरुवारी येऊ घातलेले निकाल याच पद्धतीचे असावेत अशी मानसिकता तयार करण्याकरिता तर जाहीर केले नाहीत ना? अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
त्याचबरोबर सातारच्या नवलेवाडी येथे ईव्हीएम बिघाडाची घटना अत्यंत धक्कादायक असून तिथे प्रत्येक मतदान कमळालाच जात होते हे उघडकीस आले आहे. देशातील प्रत्येक बिघडलेले मतदान यंत्र कमळालाच मतदान कसे देते? हा प्रश्न जनतेला पडला आहे. म्हणूनच ज्या वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत, त्यांनी मतदारसंघनिहाय व बुथ निहाय निकाल जाहीर करावेत, वस्तुस्थिती जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, असेही सावंत म्हणाले.