नवी दिल्ली – रांची येथे झालेल्या दुसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधल्यानंतर भारतीय संघ आता मालिकेतील अखेरचा आणि तिसरा सामना जिंकत मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. यापूर्वी भारताने द. आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे.
मालिकेतील सलामीच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागल्यानंतर दुसरा सामना सहज जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या मालिकेत कर्णधार शिखर धवन आणि युवा फलंदाज शुभगन गिल या सलामीच्या जोडीला संघर्ष करावा लागला आहे. या मालिकेत धवन केवळ 17 धावा करू शकला आहे. दुसरीकडे गिल पहिल्या सामन्यात स्वस्तात बाद झाल्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने चांगली सुरुवात केली. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.
मधल्या फळीत श्रेयस अय्यर, इशान किशन आणि उपकर्णधार संजू सॅमसन यांनी दमदार कामगिरी केली आहे. अय्यर आणि सॅमसन सातत्यपूर्ण खेळी करत असताना किशनही पुन्हा फॉर्मात परतला आहे. या तिघांनी फॉर्म कायम ठेवल्यास संघाला विजयाची संधी आहे.
गोलंदाजीत भारताची मदार महंमद सिराजवर अवलंबून आहे. तसेच फिरकीपटू शाहबाज अहमद आणि रवी बिश्नोई यांनीही चांगले पदार्पण केले असून त्यांना निर्णायक मारा करावा लागणार आहे.
दुसरीकडे दुखापतीतून पुनरागमन झाल्यापासून फॉर्ममध्ये नसलेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. आता तो निर्णायक सामन्यात परततो की नाही यावर संघाचे यश-अपयश अवलंबून आहे.