हिमांशू
शपथविधी लाइव्ह बघायचा म्हणून टीव्हीसमोर वाट पाहत बसलो होतो, तेवढ्यात सौभाग्यवतींनी आम्हाला मंडईत पिटाळलं. वेळेत भाजी आणली नाही, तर संध्याकाळी तुम्हाला नावडती उसळ खावी लागेल, अशी धमकीही दिली. केवळ संध्याकाळी आवडती भाजी मिळावी म्हणून मंडईत गेलो आणि तिथे आम्हाला मोठ्ठा साक्षात्कार झाला. मागील महिनाभर एकदा इकडच्या आणि एकदा तिकडच्या नेत्यांची राजकीय चाणक्यगिरी पाहून आमच्या सौभाग्यवती बरंच काही शिकल्या आहेत, हे यथेच्छ जाणवलं. वास्तविक, भाजी आणणं हे काम आमचं नाही. (कृपया, स्त्री-पुरुषांच्या कामाच्या विभागणीचा संदर्भ जोडू नये.) मंडईतून ज्या-ज्यावेळी आम्ही घरी जातो, त्या-त्यावेळी पडलेल्या उमेदवाराप्रमाणं आमचं “स्वागत’ होतं, असा आमचा अनुभव आहे.
भाज्यांमधलं आम्हाला काहीही कळत नाही, देतील ते उचलून आणतो, बार्गेनिंग करता येत नाही, कोवळं-जुनं कळत नाही, असे आरोप आमच्यावर केले जातात. “”तुम्हाला कुठं पाठवायची सोय नाही,” हेही ऐकावं लागतं. असे प्रसंग वारंवार आल्यामुळं आमच्या घरात सर्वांनी मिळून आखलेला एक “किमान समान कार्यक्रम’ आहे. त्यानुसार सौभाग्यवतींकडे भाजी मंडई मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे. परंतु काल मात्र ही घडी विस्कटली. मंडईत पोहोचल्यावर आम्हाला समजलं, की बाईसाहेब गेल्या काही दिवसांत बरंच राजकारण शिकल्यात. एकेका भाजीचे दर ऐकताना, आम्हाला मंडईत पिटाळणं हा सौभाग्यवतींचा “मास्टरस्ट्रोक’ होता, हे लक्षात आलं.
“कांदे संपलेत, जरा जास्त आणा,’ हे वाक्य आठवल्यावर कांद्याचा ढिगारा शोधून विक्रेत्यासमोर उभा राहिलो. शंभर रुपये प्रतिकिलो भाव ऐकून त्याच ढिगाऱ्यातला एक कांदा उचलून नाकाला लावला. “दोन किलो घेतले तर काही कमी नाही का,’ असं विचारताक्षणी कांदेवाल्यानं आमच्याकडे इतक्या चमत्कारिक नजरेनं बघितलं, जणू आम्ही बहुमत नसताना सत्तास्थापनेचा दावा करतोय! “जेंटलमेन लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. साहेब, जरा पेपर-बिपर वाचाल का नाय? कांदा मिळतोय अजून, हेच नशीब समजा,’ अशा शब्दांत विक्रेत्यानं आमची पुरती अब्रू काढली.
किल्ला लढवण्यापेक्षा राजीनामा देऊन मोकळं व्हावं, असा निर्वाणीचा विचार मनात आला. तरीही विक्रेत्यानं आम्हाला “साहेब’ म्हटल्यामुळं त्यातल्या त्यात हुरूप आला. “एवढी बिकट अवस्था?’ आम्ही बाजू सावरण्यासाठी विचारलं आणि विक्रेत्यानं आमच्या सामान्यज्ञानात बरीच भर घातली. अवकाळी पाऊस वगैरे आम्हाला ठाऊक होतं. उत्पादन घटलंय, नवा कांदा येणार होता तोही कुजलाय, हेही ठाऊक होतं. पण परदेशातला कांदाही आता येणार नाही, कारण जगभर अशीच अवस्था आहे, ही आमच्या ज्ञानातली मोलाची भर होती.
शिवाय, कांद्याचे सरासरी किती ट्रक आपल्या शहरात दररोज येतात आणि सध्या किती येतायत, हेही कळलं. विक्रेत्याच्या सांगण्यानुसार, सध्या फक्त उत्तर महाराष्ट्रातून थोडाफार कांदा येतोय. तोही ओला आहे. 90 ते 120 रुपयांच्या दरम्यान भाव आत्ताच पोहोचलेत आणि लवकरच दीडशे रुपये प्रतिकिलो मोजावे लागतील, असंही कळलं. टीव्हीवरच्या चाणक्यनीतीतून खडबडून जाग आली आणि कौटिल्याचं अर्थशास्त्र आठवलं. पण ओला कांदा एवढ्या किमतीनं घ्यावा की कांद्याचा विषयच ड्रॉप करावा, याचा निर्णयच होईना. दोन्ही स्थितीत बोलणी बसणारच! राजकारणातले निर्णय तुलनेनं सोपे, होय ना?