नवी दिल्ली – केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता जून 2021 पर्यंत गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयावर विविध घटकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असतानाच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे.
या संबंधात त्यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, या घडीला असा निर्णय घेणे पूर्ण अनुचित आहे. या अडचणीच्या काळात सरकारी कर्मचारी व लष्करी दलातील जवानांना आणखी अडचणीत आणणे योग्य ठरणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारने नवीन संसद भवन बांधणे, मंत्री व पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थाने बांधणे यासाठी अडीच लाख कोटी रुपयांची योजना आखली आहे तो खर्च सरकारने रद्द करावा तसेच हजारो कोटी रुपये खर्चाचा बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करणे सोयीचे असताना मोदींनी हजारो सरकारी कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांवर नाहक गाज आणली आहे, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया मनीष तिवारी, पी. चिंदंबरम यांनी दिल्या आहेत. केंद्रीय कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रद्द करण्याचा निर्णय असंवेदनशील व अव्यवहार्य असल्याची टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कालच केली होती.