मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेचा निर्णय अखेर 27 जूनला जाहिर होण्याची शक्यता आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी 26 मार्च रोजी याचिकाकर्ते आणि प्रतिवादींचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने राखून ठेवलेला निर्णय 27 जून जाहिर करण्याचे आज संकेत दिले.
या याचिकेवर सुमारे दिड महिना नियमित सुरू असलेल्या याचिकाकर्त्यांचा मुद्देसुद युक्तीवाद राज्य सरकारच्या वतीने मातब्बर वकिलांची फौज, त्यांचा आरक्षणाच्या समर्थनार्थ झालेला जोरदार युक्तिवाद, हजारो पानांच्या नोंदी, राज्य मागास प्रवर्गाचा अहवाल आणि आजवरच्या इतर आयोगांनी यासंदर्भात सादर केलेली माहिती पाहता न्यायालय आरक्षणाबाबत काय निर्णय देणार आहे, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य सरकारने कायद्यात नव्याने दुरुस्ती करून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. याला जयश्री गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या जनहित याचिकेसह सहा याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 4 विरोधात, तर 2 याचिका आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या आहेत. तर या याचिकेत हस्तक्षेप करणारे 22 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या 16 अर्जाची सुनावणी न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर डिसेंबर महिन्यात सुनावणीला प्रारंभ झाला. गेले दिड महिने नियमित सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. तो 27 जून रोजी जाहिर करण्यात येणार आहे.