मुंबई – विद्यापीठ स्तरीय अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सोमवारी निर्णय जाहीर करण्यत येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उद्याच्या उद्या ही समिती कुलगुरु आणि प्राचार्यांशी चर्चा करणार आहे. यानंतर माजी कुलगुरुंसोबतही संवाद साधला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
उदय सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अतिशय सोप्या पद्धतीने या परीक्षा घ्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ देण्याबाबतही विचार करण्यात येईल. विद्यापीठ परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमधला संभ्रम वाढेल असे कुणीही राजकारण करु नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यूजीसीच्या 6 जुलैच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितले होते. ही तारीख राज्य सरकार पुढे ढकलू शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
30 सप्टेबरपर्यंत परीक्षा घेऊ न शकणाऱ्या राज्यांनी परीक्षेची तारीख पुढं ढकलण्यासाठी यूजीसीशी संपर्क करावा, असं कोर्टानं म्हटलंय. एखाद्या राज्याला जर परीक्षा घ्यायची नसेल तर त्यांनी यूजीसीशी चर्चा करावी असंही कोर्टानं म्हटलं आहे.