नगर -शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवावरही यंदा करोनाचे सावट आहे. त्यामुळे नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाने यंदाचा गणेशोत्सव अतिशय साध्या पध्दतीने साजरा करून, करोना विषयक जनजागृतीवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्वच मंडळांनी पुडाकार घ्यावा असे आवाहन जय आनंद मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी केले आहे.
यावर्षी राज्यातील या सर्वात मोठ्या उत्सवावर करोना विषाणूचे सावट आहे. त्यामुळे सरकारनेही सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
त्याला मुंबई, पुण्यातील मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून नगरमध्येही जय आनंद महावीर युवक मंडळाने उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मंडळाने सर्व सदस्यांची ऑनलाइन मिटिंग घेतली. यात अध्यक्ष शैलेश मुनोत, सचिव कुंतीलाल राका, महिला अध्यक्षा स्वाती चंगेडिया, सोना डागा आदी सहभागी झाले होते.
करोनाला थोपविण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, गर्दी टाळणे, वैयक्तिक स्वच्छता या गोष्टी करणे अनिवार्य बनले आहे. गणेशोत्सवात या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गर्दीमुळे तडा जावू शकतो, असे ही ते म्हणाले.