मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालय आणि सीईटीचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांनी मंगळवारी राज्यातील विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
त्यावेळी त्यांनी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामुळे विद्यार्थी आणि पालकात परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
या समितीचा अहवाल लवकरच राज्यसरकारला पाठवण्यात येईल. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल. तसेच एम. फील आणि पीएचडीच्या परीक्षेबाबत चर्चा करण्यात आली आहे. यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असं सामंत म्हणाले.
अफवांवर विश्वास ठेऊ नका
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठे आणि महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या अफवा पसरवल्या जात असून विद्यार्थी आणि पालकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलं.