नवी दिल्ली – कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी देशातील सर्व राज्यांच्या परीक्षा मंडळांना बारावीच्या परीक्षासंदर्भात सीबीएसईप्रमाणे निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
सीबीएसईप्रमाणे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्या, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
याबाबत प्रियांका गांधी यांनी एक ट्विट केले आहे. सीबीएसईप्रमाणे राज्यांच्या बोर्डांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची बाजू ऐकून घ्यावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय जाहीर करावा. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा, त्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रियांका गांधी यांनी मंगळवारी सीबीएसई बोर्डाने बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले होते. अखेर विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
दरम्यान, केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारने दोन दिवसांत निर्णय घेऊ असे म्हटले होते. त्याप्रमाणे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील वाढत्या करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्राने हा निर्णय घेतला आहे.