पावसाळी चेंबरमध्येच मेट्रोचा खांब उभारल्याने पूरस्थिती ः महापालिकेने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष
पुणे – छत्रपती संभाजी महाराज पुलाच्या भुयारी मार्गापासून ते गुडलक चौक आणि प्रयाग हॉस्पिटल ते पुन्हा डेक्कन बस स्थानकासमोरच्या रस्त्याचा समावेश आहे. या भागांत पावसाळी वाहिन्यांच्या कर्ल्वटमध्येच महामेट्रोने डेक्कन मेट्रो स्थानक प्रवेशद्वारासाठी खांब उभारले आहेत. त्यामुळे ही कल्वर्टमधून पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आणि या भागत पूरस्थिती उद्भवली.
सप्टेंबरमधील पावसानंतर महामेट्रोने हे खांब काढण्यासाठी पालिकेने सांगितले होते. पण, त्याकडे दुर्लक्ष करणे महामेट्रो प्रशासनाच्या अंगलट आले आहे.जंगली महाराज रस्ता आणि फर्गसन महाविद्यालय रस्ता महापालिकेने अर्बन स्ट्रीट प्रोग्रॅम अंतर्गत विकसित केले आहेत. या रस्त्यांवर पाण्याच्या निचऱ्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पावसाळी वाहिन्या टाकलेल्या आहेत.
त्या थेट नदीपात्राच्या बाजूला जोडण्यात आलेल्या आहेत. त्यानंतरही शुक्रवारी दोन्ही रस्त्यांवर पूरस्थिती उद्भवली. याचा आढावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला असून, या बैठकीत पूरस्थिती उद्भवलेल्या कारणांवर विचार करण्यात आला. त्यात पूर्ण ठपका महामेट्रो प्रशासनावर ठेवण्यात आला आहे.
भांडारकर रस्ता, बीएमसीसी रस्त्यावर मोठा पाऊस झाल्यानंतर फर्गसन कॉलेज रस्त्यावर पाणी वाहून येते. ते उताराने गुडलक चौकातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याबाजूला, तर पुढे प्रयाग हॉस्पिटलकडून डेक्कन बसस्थाकासमोर येते. हे पाणी वाहून जाण्यासाठी हॉंगकॉंग लेन ते जंगली महाराज रस्ता ओलांडून नदीबाजूला ही दगडी बॉक्स कल्वर्ट पालिकेने यापूर्वीच बांधली आहे. ही कल्वर्ट आकाराने मोठी असल्याने त्यातून सहज पाणी वाहून जात होते. मात्र, मेट्रोने आता या कल्वर्टमध्येच खांब उभारल्याने पाणी वहन क्षमता घटल्याने यंदाच्या पावसाळ्यात तीन वेळा हा प्रकार घडला आहे.
लोखंडी जाळ्यांच्या चोरीचाही फटका
जंगली महाराज रस्ता विकसित करताना महापालिकेने पाणी वाहून जाण्यासाठी लोखंडे जाळ्या बसवल्या होत्या. तसेच रस्त्याकडेने प्रत्येक तीन फुटांवर पाणी जाण्याची व्यवस्थाही केलेली आहे. मात्र, त्यानंतरही रस्त्यावर वारंवार तळे साचत आहे.
प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात जंगली महाराज रस्त्याच्या जोड रस्त्यांवरील 40 ते 50 लोखंडी जाळ्या चोरीस गेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने तेथे फायबर अथवा सिमेंटच्या जाळ्या बसवल्या आहेत. त्यांची छिद्रे लहान असून प्लॅस्टिक तसेच झाडांच्या पानांमुळे ती बुजली जातात. परिणामी, रस्त्यावर पाणी साचणे सुरू होत आहे. त्यामुळे आता पुन्हा लोखंडी जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.