कोलकत्ता – सध्या डिजिटल प्रक्रियेद्वारे कर्ज वितरणाचे व्यवहार 20 टक्के आहेत. ते पुढील पाच वर्षांत 55 ते 75 टक्के होण्याची शक्यता असल्याचे वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
याबाबत बोलताना बडोदा बॅंकेचे वित्तीय तंत्रज्ञान प्रमुख अखिल हंडा म्हणाले की, सध्या रिटेल आणि लघुउद्योगांकडून 20 टक्के कर्ज डिजिटली घेतले जात आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक वातावरण निर्मिती झाली आहे. अशाप्रकारे कर्ज घेण्याबाबत वातावरण निर्मिती होत आहे. सध्या मोठ्या शहरात त्या तंत्रज्ञानाचा वापर करून कर्ज घेतले जाते.
आगामी काळात छोट्या शहरातही या तंत्रज्ञानाचा वापर होण्याची शक्यता आहे. सध्या देशात साडेसात कोटी लघुउद्योग आहेत. त्यातील 1 कोटी 80 लाख उद्योगांनी डिजिटायझेशन केले आहे. इतर उद्योगांच्या डिजिटायझेशनसाठी बॅंका आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्या प्रयत्न करीत आहेत.
त्याचबरोबर सरकारही डिजिटायझेशनला पाठिंबा देत आहे. त्यामुळे आगामी काळात बहुतांश लघुउद्योग डिजिटायझेशनचा मार्ग अवलंबणार आहेत. त्यानंतर सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न बॅंकांनी करण्याची गरज आहे.