तरीही चीनची अनेक देशांशी दादागिरी अयोग्य- गुरुमूर्ती
नवी दिल्ली – चीनच्या डोक्यावर भलेमोठे कर्जाचे ओझे आहे. तरीही चीन भारतासह अनेक देशांबरोबर दादागिरी करीत आहे. काळाच्या ओघात चीनला हे परवडणार नाही असे रिझर्व्ह बॅंकेचे संचालक एस गुरुमूर्ती यांनी म्हटले आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने करोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक व्यासपीठावरील भारताची परिस्थिती, या विषयावर बोलतांना गुरुमूर्ती म्हणाले, चीनने आपल्या डावातील कार्डाचा गरजेपेक्षा जास्त वापर केला आहे. चीनवर त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 250 टक्के कर्ज आहे. अशा परिस्थितीत वाटचाल करण्यासाठी चीनला जागतिक बाजारपेठेवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र चीन आंतरराष्ट्रीय राजकारणात बेजबाबदारपणे वागत आहे.
इतरांना खटकणार नाही अशा पद्धतीने स्वतःचे सादरीकरण करणे सध्याच्या परिस्थितीत चीनला आवश्यक आहे. मात्र तरीही चीन अनेक देशाबरोबर एकदाच संघर्ष करण्याच्या तयारीत आहे. चीनने युद्धासाठी अनेक आघाड्या उघडल्या आहेत.
चीनकडे मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग होत असले तरी चीनची एकूण आर्थिक परिस्थिती पाहता चीनला हे परवडणार नाही. कारण चीनवर कर्जाचे मोठे ओझे आहे. त्याने जागतिक समुदायाला दुखावल्यास जागतिक बाजारपेठेतील चीनच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो.
चीनला डोक्यावरील कर्जामुळे चीनने भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप यासारख्या बलाढ्य बाजारपेठांना दुखावून चालणार नाहीत.
चीनचा भूप्रदेश मोठा आहे. चीनची अर्थव्यवस्था वाढली आहे. मात्र तरीही जागतिक व्यासपीठावर चीनला सन्मानाने वागविले जात नाही असा चीनचा समज झालेला आहे. त्यामुळे चीन स्वतःची वेगळी ओळख आणि ब्रॅंड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यासाठी स्वत:चेच नुकसान करणाऱ्या अयोग्य मार्गाचा वापर करीत असल्याचे गुरुमूर्ती यांनी सूचित केले.
चीनचा इतिहास साम्राज्य निर्मितीचा इतिहास आहे. मात्र 19व्या शतकानंतर जग अधिक बदलले आहे. साम्राज्य निर्मितीची संकल्पना कालबाह्य झाली आहे. मात्र चीन इतिहासातून बाहेर पडायला तयार नाही. याचे परिणाम चीनला दीर्घकाळ भोगावे लागतील. चीनने भारताबरोबर गलवान व्हॅलीत संघर्ष उकरुन काढला आहे. त्यामुळे भारत सरकार बरोबरच भारतातील अनेक बाजारपेठा चीनविरोधात पाय रोवून उभ्या राहू लागल्या आहेत.
चीनने जपान विरोधात आघाडी उघडली आहे. तेथील एक बेट आपलेच असल्याचे चीनने म्हटले आहे. चीन, तिबेट आणि तैवान आपला भूभाग असल्याचे सांगत आहे. हॉंगकॉंगचे स्वरूप बदलण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. साऊथ चायना समुद्रात चीनने आपला प्रभाव वाढविला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, जपान, भारत, अमेरिका हे देश चीनच्या विरोधात राजकीय हालचाली गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत.