चेन्नाई – तामिळनाडुचे सुधारणावादी नेते रामास्वामी पेरियार यांच्या विषयी अभिनेता रजनीकांत यांनी जे वक्तव्य केले आहे त्यावरून त्यांच्यावर कारवाईचा आदेश द्यावा अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. द्रविडर विदुलथलाई कझगम या संघटनेने ही याचिका दाखल केली होती. ही याचिका सुनावणीला घेण्यास ठोस आधार नाहीं असे कोर्टाने नमूद केल्यानंतर संबंधीत संघटनेने ही याचिका मागे घेतली.
या प्रकरणी सरकारी वकिलांनी आज झालेल्या सुनावणीत सांगितले की रजनीकांत यांच्यावर कारवाई करण्याच्या संबंधात पर्यायी मार्ग काय आहे याविषयी आमच्याशी चर्चा न करताच संबंधीत संघटनेने ही याचिका सादर केली आहे. ते म्हणाले की संबंधीत याचिकाकर्त्याने रजनीकांत यांच्या विरोधात 18 जानेवारीलाच पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावर काय कारवाई केली जात आहे याची माहिती न घेताच त्यांनी थेट ही याचिका दाखल केली आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
पेरियार हे महान नेते होते याविषयी कोणाचेच दुमत नाही, पण रजनीकांत यांनी केवळ त्यांच्या विषयी एका मासिकात प्रकाशित झालेल्या लेखावरून टिपण्णी केली आहे. तथापी त्यावर कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने ही याचिका ग्राह्य धरली जाणार नाही असे नमूद केले त्यांनतर याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागे घेतली. पेरियार यांच्या एका जुन्या सभेत हिंदु देवदेवतांची विटंबना करण्यात आली होती असे विधान रजनीकांत यांनी केली होते त्यावरून त्यांच्या विरोधात ही याचिका करण्यात आली होती.