सातारा – आनेवाडी टोलनाक्यावर नेहमीच वादाच्या घटना घडत असतात. याचाच प्रत्यय सोमवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास वाहनधारकांना अनुभवायास मिळाला. साताराहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या वाहन धारकांमध्ये आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये सोमवारी रात्री चांगलाच वाद झाला. यावेळी टोल कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांना अपशब्द वापरत चांगलीच दमदाटी केली.
सोमवारी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या बऱ्यापैकी रांगा लागल्या होत्या. त्यातच एक बुथ बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे रांगामध्ये ताटकळत थांबलेल्या काही वाहनधारकांनी बंद असलेल्या बुथच्या लेनमधून वाहने नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब निदर्शनास येताच काही कर्मचाऱ्यांनी संबंधित वाहने अडवित त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
यावेळी संबंधित वाहनधारकांनी “टोलचे पैसे घ्या पण आम्हाला जाऊ द्या, आम्हाला गडबड आहे, आमचे महत्वाचे काम आहे’ अशा विनवण्याही केल्या. वाहनधारकांशी वाद घालून त्यांना दमदाटी करणे, शिवीगाळ करणे याशिवाय मारहाण करण्यातही पटाईत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्या वाहनधारकांना चांगलेच धारेवर धरले.
टोल तर द्यावाच लागेल परंतु, तुम्ही बंद असलेल्या लेन मधून वाहने घातलीच का? अशी दमबाजी कर्मचाऱ्यांनी सुरु केली. या वादावादीमुळे इतर बुथवर काम करणारे कर्मचारीही आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीला आले. त्यामुळे वाहनांच्या रांगा वाढू लागल्या, बराच वेळ वाहनधारक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद रंगला, शेवटी शेवटी हा वाद हातघाईवर येऊ लागल्याने रांगांमधील काही वाहनांमध्ये असणाऱ्या प्रवाशांनी मध्यस्थी करत हा वाद सोडविला.