नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच हैदोस घातला आहे. या कोरोनामुळे देशाच्या सर्व स्तरावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. तसेच आरोग्य यंत्रणा ही पूर्णपणे कोलमडून गेली असल्याचे पाहायला मिळत आहे.कुठे इंजेक्शनची कमतरता तर कुठे ऑक्सिजन अभावी लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच परिस्थिती ही मागच्या दोन महिन्यापासून देशात पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासमोरच्या प्रत्येक नागरिकासमोर एक धडकी भरवणारी माहिती आणली आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात अवघ्या तीन महिन्यातच विध्वंसक परिस्थितीत निर्माण झाली आहे. दररोज लाखो लोक करोनाच्या विळख्यात येत असून हजारो लोक मरण पावत आहेत.या सर्वात मोठी आणि धक्कादायक माहिती म्हणजे दुसऱ्या लाटेत मृतांच्या आकड्याने चढता कायम ठेवला आहे. फक्त एप्रिल महिन्याच्या ३० दिवसांत देशात ४५,००० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
दिवाळीनंतर देशात कोरोनाची संख्या काही प्रमाणात कमी झाली होती. त्यामुळे भारताने करोनावर विजय मिळवल्याचे दावेही सरकारांकडून केले जात होते. अशातच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. बघता बघता मार्चमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर एप्रिलमध्ये एका दिवसातील विश्वविक्रम करोना रुग्णसंख्येची नोंद भारतात झाली.
१ एप्रिल रोजी देशातील एकूण करोना रुग्णसंख्या होती १,२३,०२,११५ आणि एकूण मृत्यू संख्या होती १,६३,४२८. तर देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या होती ६,१०,९२९ इतकी. ही सख्या ३० एप्रिल रोजी प्रचंड बदलून गेली. ३० एप्रिल रोजी देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या पोहोचली १,८७,५४,९८४ आणि मृतांचा आकडा पोहोचला २,०८,३१३ वर. तर ३० एप्रिल रोजी देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या होती ३१,६४,८२५ इतकी
एप्रिल महिन्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने आपले हात पाय चांगलेच पसरले. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानसह देशातील विविध राज्यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे पाहायला मिळू लागले. आधी रुग्णालयांबाहेर रांगा दिसत होत्या, नंतर स्मशानभूमी कब्रस्थानं यांच्याबाहेर मृतदेहांच्या रांगा लागल्याच्या दृश्यांनी देशातील परिस्थिती कोलमडत असल्याचं दिसून आलं. एप्रिलमध्ये करोनानं मृत्यूचं तांडवच घातलं. अवघ्या तीस दिवसांत देशात ४५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला.