काठमांडू – नेपाळमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आलेल्या पूरात मरण पावलेल्यांची संख्या आता 88 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात देशातील विविध भागांमधून 11 जणांच्या मृत्यूची माहिती मिळाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
देशभरात आतापर्यंत 30 जण बेपत्ता झाले आहेत, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे. पूर्व नेपाळमधील पंचथर जिल्ह्यात सर्वाधिक 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ इलाम आणि धोती या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
याशिवाय कालीकोट, बैतडी, डडेलधुरा, बझांग, हुमला, सोलुखुंबू, प्युठान, धनकुटा, मोरंग, सुनसरी आणि उदयपूर यासारख्या 15 जिल्ह्यांमध्येही जीवितहानीचे वृत्त आहे.
पूरात बुडून मरण्याव्यतिरिक्त प्रचंड पावसामुळे घरांच्या भिंती अंगावर पडणे, दरडी कोसळण्यामुळेही अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. आज 11 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी दिवसभरात 63 जणांचा मृत्यू झाला. तर मंगळवारी 14 जणांचा मृत्यू झाला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नेपाळमधील 11 जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती अधिक रौद्र आहे. बाजहांग जिल्ह्यात 21 जण बेपत्ता झाले आहेत. आजपासून पावसाने उघडीप दिली सल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. नेपाळ पोलीस, आर्मड पोलीस फोर्स, राष्ट्रीय तपास विभाग आणि नेपाळच्या लष्कराने मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू केले आहे. हुमला जिल्ह्यात काही विदेशी पर्यटक अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. या भागात रविवारपासून बर्फवृष्टी सुरू झाली आहेत. त्यामुळे मदत आणि बचावकार्यात अडथळे येत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.