मुंबई – तौक्तेचक्रीवादळामुळे मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात बार्ज भरकटले होते. या दुर्घटनेत आता आणखी 4 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मृतांची संख्याही 49 वर पोहोचली आहे, तर आणखी 37 जण बेपत्ता असून, नौदलाचे जवान त्यांचा शोध घेत आहेत.
मुंबईच्या खोल समुद्रात चार बार्जवर एकूण 707 खलाशी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बार्जचे नांगर तुटल्याने खवळलेल्या समुद्रात ते भरकटले होते. बार्ज भरकटल्याची माहिती मिळताच नौदलाने युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. आतापर्यंत 611 जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे.
पी-305 या बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते. त्यापैकी 186 कर्मचाऱ्यांना नौदलाने रेस्क्यू केले आहे. आयएनएस कोच्ची या युद्धनौकेच्या सह्याने या कर्मचाऱ्यांना रेस्क्यू करण्यात आले आहे. ताशी 100 किमी वाऱ्याचा वेग असतानाही नौदलाने युद्धपातळीवर कार्य करून कर्मचाऱ्यांना वाचवले आहे. अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
आज सकाळी काही कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले होते, तर दुपारी आणखी काही कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले आहे. आतापर्यंत एकूण 49 जणांचे मृतदेह सापडले आहेत. आणखी 37 जणांचा शोध सुरू आहे.
दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश
समुद्रात तौक्तेचक्रीवादळ येणार याची पूर्व कल्पना असतानाही बार्ज पी-305च्या कॅप्टनने बंदरावर परत न जाता समुद्रातच राहण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ओएनजीसीच्या तेल उत्खनन प्रकल्पावर काम करण्याचे कंत्राट ऍफकॉन कंपनीकडे होते. याच ऍफकॉन कंपनीने नियुक्त केलेले 261 कर्मचारी बार्ज पी-305 वर होते. बार्ज पी-305 समुद्रातच थांबण्याचे आदेश ऍफकॉन कंपनीने दिल्यामुळेच कॅप्टनने चक्रीवादळातही बार्ज पी-305 भर समुद्रातच कार्यरत ठेवली.
ऍफकॉन कंपनी आणि बार्ज पी-305 चा कॅप्टन यांच्या चुकीच्या निर्णयामुळे 261 लोकांची जीव चक्रीवादळात सापडला. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.