लातुर – नैराश्यातून जमीनीवर कोसळल्याने आणखी एका एसटी कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्यापही पुर्ण झाल्या नाहीत शिवाय महामंडळाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करत अनेकांना निलंबित केले आहे. दरम्यान निलंबनाच्या कारवाईचा अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी धसका घेतल्याचे दिसून आले आहे. या भीतीने राज्यात एसटी कर्मचारी दडपणाखाली असल्याचे चित्र तयार झाले आहे. आतापर्यंत चार एसटी कर्मचाऱ्यांचा यामुळे मृत्यू झाला आहे.
शिवकुमार भानुदास शिरापुरे, वय 38 असे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून ते लातुर जिल्ह्यातील देवणी येथील रहिवासी आहेत. शिरापुरे निलंगा एस टी आगारात कार्यरत होते. शिरापुरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. कोसळ्यामुळे शिरापुरे यांना गंभीर दुखापत झाली होती त्यांच्यावर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान 10 दिवसांनतर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्याेत मालावली आहे.
आधिच तुटपूंजा पगार आणि त्यात संप अशा दुहेरी संकटात एसटी कर्मचारी असताना संपकरी कर्मचाऱ्यावर निलंबणाची कारावाई करण्याचा सपाटा महामंडळाकडून लावण्यात आला आहे. या कारवाईचा अनेक कर्मचाऱ्यावर परिणाम झाला असून कर्मचारी नैराश्यात गेल्याचे दिसून येत आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीसह अन्य् मागण्यासाठी संप पुकारला आहे. मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहील यावर एसटी कर्मचारी ठाम आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. निलंबनाच्या कारवाईचा अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी धसका घेतल्याचे सद्या चित्र आहेत.