मुंबई – मुंबई महापालिकेच्या घाटकोपर राजावाडी येथील रुग्णायलातील अतिदक्षता विभागातील रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याची घटना काल उघडकीस आली होती. त्या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला आहे.
श्रीनिवास येल्लप्पा, वय २४ असे या रुग्णाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी श्रीनिवास यांना राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्यांना मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले होते. श्रीनिवास यांच्या नातेवाईकांना त्यांच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता.
श्रीनिवास हे बेशुद्धावस्थेत होते. बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यापासूनच त्यांची प्रकृती गंभीर होती. याची कल्पना त्यांच्या नातेवाईकांना दिली होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा उंदीर चावण्याच्या घटनेशी संबंध नाही, असे राजावाडीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.
या घटनेनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला होता. ‘सायन रुग्णालयात मृतदेहा शेजारी मुंबईकरांना उपचार घ्यावे लागतात आणि राजावाडीत आयसीयूमध्ये रुग्णांचे डोळे उंदीर कुरतडतात मग 80 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई महापालिकेचे 1 हजार 206 कोटींचे आरोग्याचे बजेट कोण खाते? कोण तिजोरी कुरतडतेय? अत्यंत दुर्दैवी घटना आणि संतापजनक सारे!’ असे ते म्हणाले होते.