दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी आल्यावर वाटत होते अस्वस्थ
श्रीगोंदा – सूर्य सध्या आग ओकत असल्याने तापनाने उच्चांक गाठला आहे. उष्णतेचे वाढलेले प्रमाण जीवघेणे ठरत असून, सोमवारी (दि. 29) सायंकाळी पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चंद्रभान सूर्यभान राऊत (वय 36, रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. राऊत हे 2001 पासून केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत होते. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी पेडगावमध्ये शेती करू लागले. सोमवारी सकाळी राऊत दिवसभर शेतात काम करत होते. सायंकाळी 5 वाजता ते शेतातील सर्व कामे उरकून घरी आले. घरी आल्यानंतर त्यांना अचानकपणे अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर काही क्षणातच त्यांना उलट्या देखील झाल्या. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी भीमा नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.