तू मला एखादा जिप्सी जसा हातात फिडल घेऊन गात सुटतो ना, न थांबणाऱ्या वाटेच्या शोधात… अगदी तसाच वाटतोस. फक्त कोसळत राहतोस तर कधी गाण्याच्या सुरांसारखा रिमझिमत राहतोस. कधी डोंगरावर, कधी गवताळ कुरणांवर, कधी ओसाड माळरानावर, तर कधी एखाद्या गवत फुलाच्या पाकळ्यांवर… कसं रे कळतं तुला कधी आणि कुठे बरसायचे ते?
तुला पाहताना मला तो रंगीबेरंगी कपडे घातलेला जिप्सी आठवतो नेहमी. थहू ीें थीीूे/ ङशीं ङर्ळींश ींहश ङळषश. असे म्हणणारा तो जिप्सी, मला वाटत तूच आहेस. तसाही तुला त्या बाउल माणसांबद्दल माहिती असायचे काहीच कारण नाही… पण ती माणसे तुझ्यासारखीच असतात. तशीच शांत… आपल्याच तालात आणि नादात असलेली. हातात एखादं वाद्य घ्यायचं. कविता, गाणी गुणगुणत वाट फुटेल तिकडे भटकायचं…
वैश्विक असतात अशी माणसे, तुझ्यासारखीच नितळ पण मनस्वी. निसर्ग हेच आयुष्य समजणारी. कदाचित एखाद्याला वेडीही वाटू शकतील, कारण तितकीच मनस्वीही असतात हे जिप्सी. घर दार सोडून भटकताना आपल्यातल्या आत्मारामाला सुखावण्याचे काम ते करतात. मनाला येईल तेव्हा हसतात, रडतात, गाणी गातात. यांना भौतिक जगाशी काहीच देणे घेणे नसते. ना जग बादलायचे असते ना स्वत:ला. ना माणसे जोडायची असतात ना तोडायची असतात.
एक आणि एकच ध्येय असते यांचे, तुझ्यासारखे बरसत राहणे. ना सुखाची सावली ना दु:खाचे ऊन. ही माणसे फक्त जगतात आणि जगून सोडून देतात जगलेला तो प्रत्येक क्षण. त्या जात्या क्षणावर त्यांचे तेवढेच प्रेम असते जेवढे ते येत्या क्षणावर करतात. अशी माणसे ते प्रेम जगतात.
‘र्ङीेंशीी वेशीप’ीं षळपरश्रश्रू ाशशीं ीोशुहशीश…
ढहशू रीश ळप शरलह ीेंहशी रश्रश्र रश्रेपस.’
हे तुही सांगतोस आणि ते जिप्सीही सांगतात. प्रेम माहिती असणे आणि ते करणे यात तितकेच अंतर आहे जेवढे अंतर आभाळ आणि आकाशात आहे. आभाळ खिडकीत मावते आणि आकाश अथांग असते.
प्रेमाविषयी खूप वाचले, बोलले, ऐकले जाते नेहमीच, पण प्रत्यक्षात ती भावना जगायची वेळ आली की खरा गोंधळ उडतो. प्रेमाची ओळख झाली… प्रेम माहिती झाले… पण पुढे काय? नेमक्या तिथेच तू आठवतोस. तू आणि तुझी वैश्विकता. मग ती सगळेच आयाम भरून येते.
या पुढे ‘काय’ चे उत्तर तू देतोस.
प्रेम कसे करावे हे शिकवतोस. कारण प्रेम माहिती झाले की नेमक्या त्या क्षणीच ते करणे सोडून दिले जाते बरेचदा. त्यापुढे प्रेम जगावं लागतं आणि तिथूनच आपण ते करणं सोडून देतो. प्रेम जगणारी माणसे तिथून पुढे चालायला लागतात.
ज्याच्यावर प्रेम आहे तो ‘देह’रुपाने त्यांच्या सोबत असो नसो ती स्वतःच्या आत त्यांना रुजवतात. वाढवतात. चालत राहतात. स्वतः संपेपर्यंत. जसे की एका मनाचे दोन चेहरे. तुम्ही प्रेम जगणाऱ्या माणसाचे डोळे पाहा, हात बघा की त्याचे शब्द बघा… त्या सगळ्यात तुम्हाला दोन चेहरे दिसतील, स्पष्ट. एकाच चेहऱ्याची दोन माणसे किंवा एकाच मनाचे दोन चेहरे.
जगात खूप माणसे असतात. प्रत्यक्ष हातात फिडल न घेतलेली पण जिप्सीपणाचा स्पर्श झालेली. ही माणसे स्वतःला बदलवत जातात, त्यांच्या आसपासचं जग बदलवण्यावर त्यांचा विश्वास नसतो, ती स्वतःला घडवत असतात. अर्थात मी म्हणेन की तुझी वैश्विकता अबाधितच आहे. कारण तू कोसळताना जाणवून देतोस तुझ्या पाऊसपणाच्या वैश्विक छटा.
आम्ही मात्र उगाचच बुडबुडे होऊन आणि वैश्विकतेचा भास लेऊन मी, तो, हा, हे असे सारे भेद निर्माण करत मी पणाच्या मुळाशीच येऊन थांबतो. जसे की आम्ही खरंतर… हतबल मानसिक रातकिडे असतो. सतत कुरकुरणारे, आपापल्या वळचणींना विश्व समजणारे, अधोरेखित कर्ण किंवा स्वतःला अश्वत्थाम्याचे वंशज म्हणवणारे.
तुला खरं सांगू, सॉक्रेटिस आणि त्याचा कंदिल नंतर कधीच कुणामध्ये दिसले नाहीत आणि ती विचारांची नितळताही. आम्ही सारे डोळ्यांवर पट्टी बांधलेले एकमार्गी. कधी कधी झापड बांधलेले देखील. एकाच ईझमचे विचार मानत राहिलेले. संभवामी युगे युगे प्रत्येक युगात हे जंजाळ संपवण्यासाठी, पुन्हा प्रेम जागवण्यासाठी त्याला यावच लागेल. मला वाटते तोच आज तुझ्या रूपाने आलाय. आपली वैश्विकता दाखवायला. कारण आज मनातला पाऊसही वैश्विक होऊ घातलाय.
बस्स! एवढंच लिहावसं वाटतं मला तुला हाक मारताना. कारण तो एकच शब्द योग्य वाटतो तुझ्यासाठी. अचानक आभाळ भरून यावं आणि तुझे दरवळ सरींसोबत बरसावेत. मी सचैल भिजावे त्या दरवळात. अशावेळी बाकी शब्द कोरडे वाटतात मला. तू झरतोस मनात… कानात… मियॉं की मल्हार… लहरावा तसा. असं कधी झालं ना, की मी ऐकत राहते झिरमिरत्या स्वरांतलं एखादं गाणं जे मला आठवण करून देतं सकाळच्या ओथंबलेल्या दवाची.
मी अडखळते, हरवून जाते त्या शब्दांत अन् त्याचवेळी कौशिकी गात असते, याद पियाकी आये… खरं सांगू, तुझी आठवण या गाण्याशी जोडली गेलीय की, हे गाणं तुझ्या आठवणीशी? हे नाहीच समजत मला. पण तुझ्या आठवणीसाठी हे गाण छान आहे. बघ पुन्हा भरकटले मी. तुला पाऊस म्हणता म्हणता मी आठवणींमध्ये रमले. हे असंच होतं नेहमी आणि नेहमीचीच ही भरकट. अरे, तापलेल्या ओढाळ मनाला एक फुंकर हवी असतेच ना? पहाटेच्या ओल्या जामुनी रंगात मी शोधते तुला माझ्याच मिटलेल्या डोळ्यांमध्ये.
मला वाटतं, तू हरवू नयेस म्हणून मीच तुला डोळ्यांमध्ये लपवून ठेवलय की काय? तसं असेल तर खरंच उमलून ये माझ्या डोळ्यांत एखादं मंद सुवासाचं स्वप्न होऊन. मी मग रुजवेन, सजवेन, तुला मनाच्या अंगणात. किंवा तुझा चाफा होऊन राहीन अबोल, मुग्ध तुझ्या आठवणींत गुरफटून… पण तू पाऊस बनून खरंच ये एकदा. तुझ्या दरवळांची लिपी गिरवताना मी तुलाही गिरवेन धुक्याच्या पदरात लपवून,जांभळरानातल्या ओल्या गंधाळवाऱ्यासारखं…
पहाटेच्या केशरपंखी दवांत मिसळून जेव्हा तू गुलबटतोस आणि आळवाच्या पानावर आरास मांडतोस ना! तेव्हा न जाणे कितीतरी चांदण्या लपत असतील त्या थेंबोळ्यात. मी मनातल्या उमलणाऱ्या चाफ्याचे भाव उजळून घेते जेव्हा तू सावळ्या रुपात झिरमिरताना मला चातक बनवतोस. तुला डोळ्यांनी टिपणं हा सोहळा होतो तेव्हा.
तावदानांवर जमलेली तुझ्या थेंबांची नक्षी मी आंगभर गिरवते. जेव्हा जलगर्भ मेघ मला कालीदासाच्या यक्षाची आठवण करून देतात. तुझे येणे हा एक उमलसण असतो. एक सुगंधसोहळा जो पहिल्या पावसाचा, मातीच्या उन्हाळलेल्या मनानं फुलवलेल्या पहिल्या दरवळाचा अनुभव असतो. मी ही नहाते मग तुझ्या सावळेपणात सचैल धरणी होऊन, अन् गुणगुणते…
वासाचा पयला पावशे आयला…
नभाचे घुमड मातीये भारीयेला…
वासाचा पयला…
बघ तर, तुला आठवताना हे शब्द तुझ्यासारखेच बरसायला लागतात. जणू पाण्याच्या तळाशी एखादा हुंकार जन्मावा आणि त्याचे तरंग उमटावेत पाण्यावर किंवा फुलाने कळीकडे एकटक पाहताना कळीने लाजून पानांच्या आवरणात स्वतःला लपवावे. असेच काहीतरी अबोलपण मीही अनुभवते. तू येतोस. फुलतोस, फुलवतोस, उमलवतोस, हळुवार… मला वाटतं मी जणू वर्षानुवर्षे शिळा होऊन पडलेली अहिल्याच आहे बांधावरच्या कोपऱ्यातली.
तू अचानक येतोस, बरसतोस धुवांधार, ओतप्रोत अन् निघून जातोस. अतृप्त आस देऊन… तुला सांगू? तेव्हा माझ्यात खरी कविता जन्म घेऊ पाहते. ही पाऊस पेरणी होताना मन भरून येतं. का माहितीये? कारण माझ्या मनातही पेरला जातो पाऊस तेव्हा.
मला सांग झाडांच्या उंच उंच शेंड्यांवर आहे का रे तुझे घर? या पेरत्या पावसासारखे? की तुलाही शोधावा लागतो आसरा कुठेतरी. शिंपल्यात, डोहात किंवा डोळ्यात? तू असाच सांडत जातोस पावसाच्या थेंबोळ्यांसारखा अन् मी वेचत राहते तुझा थेंबंथेंब. तेव्हा मला तुझी आठवण येते. तो पाऊस वेचताना मी तुझे दरवळही वेचत राहते. अथांग पसरत जातो मग पेरलेला पाऊस तुझ्या आठवणींसोबत.
अशाच एखाद्या शांत वेळी आठवणींचे ढग भरून येतात. सोसाट्याच्या वाऱ्यात क्षण इकडून तिकडे बागडत राहतात. हुंदके विजेची भाषा बोलतात. तेव्हा डोळ्यांतून एकेक थेंब पागोळीगत ओघळायला सुरुवात होते. दाटून आलेलं मळभ स्वच्छ होईतो बरसत राहतात सरी. काही गालावरच्या खळीत लपतात. मला माहितीये तू बघशील त्या थेंबांना तेव्हा नक्की टिपून घेशील अलगद. या सरी तुझीच तर देन आहे माझ्यासाठीची.
ला सांगू? पापण्या शेवाळण्याइतकी ओल डोळ्यांत जमूच नये कधी. आभाळाची अर्धी जखम भरून येतेच कधी ना कधी. मला सांग तू, मी झरावे की सावरावे हे चांदणे गळण्याआधी? की ओठांनी उगा थरथरावे ओढ उबेची जपण्याआधी? श्वासात तुझे अत्तर का दरवळते श्वास जुने सरण्याआधी? या अशा मग कातरओळी का ओघळती विझण्या आधी?
मानसी चिटणीस