मुंबई : राज्यात मुंबईतील क्रुझवरच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणाने एकच गोंधळ घातला आहे. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली. दरम्यान, तब्बल २५ दिवसांपासून अखेर २८ ऑक्टोबरला उच्च न्यायालयाने आर्यन खानला जामीन मंजूर केला. याच मुद्यावरून आता भाजपने सरकारला टोला लगावला आहे.
आर्यनला जामीन मिळाल्यानंतर भाजपाने राष्ट्रवादी, शिवसेनेला खोचक सवाल विचारले आहेत. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या लाडक्या आर्यनला एकदाचा बेल मिळाला. त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला. आता तरी त्या अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का? आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळांनी हताश विद्यार्थ्यांकडे पाहणार का? असे भाजपाने विचारले आहे.
◾️वाढत्या अत्याचाराचा घटनांनी महिलांना असुरक्षित वाटते त्यांना दिलासा मिळणार का? @nawabmalikncp व @rautsanjay61 यांवर जनतेच्या प्रश्नांवर कधी तरी पत्रकार परिषद घेणार का? 2/2
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 29, 2021
तसेच राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांनी महिलांना असुरक्षित वाटत आहे त्यांना दिलासा मिळणार का? मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत जनतेच्या प्रश्नावर कधी पत्रकार परिषद घेणार का? असेही भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विचारले आहे. या प्रकरणावरुन राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप लावले होते. रोज सकाळी ट्विट आणि पत्रकार परिषद घेत मलिकांनी वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. बोगस जात प्रमाणपत्र, भ्रष्टाचार, निकाहनामा जारी करत वानखेडे कुटुंब बोगस असल्याचा आरोप केला होता.
नवाब मलिक यांनी तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सातत्याने केलेल्या आरोपामुळे वानखेडे कुटुंबानेही समोर येऊन उत्तर देण्यास सुरुवात केली. मलिकांविरोधात समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडेही केली आहे. एका महिलेचे फोटो तिच्या परवानगी सोशल मीडियावर पोस्ट करून तिची बदनामी केल्याचा आरोप यास्मिन यांनी मलिकांवर केला आहे.