नवी दिल्ली: गेल्या दीड वर्षांपासून देश करोना संकटाचा सामना करत आहे. मात्र अद्यापही करोना संकट संपलेलं नाही. दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. लसीकरण मोहीम वेग धरत असतानाही तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. करोनाचा विषाणू स्वत:चं रुप बदलत असल्याने, तो म्युटेट होत असल्याने चिंतेत भर पडत आहे. करोनाची लागण झालेल्यांना ताप, घश्यात खवखव आणि श्वास घेण्यास अडचण होते. मात्र आता करोनाची नवी लक्षणे समोर आली आहेत.
करोनाची नवी लक्षणे समोर आल्याने चिंता आणखी वाढली आहे. करोना टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. राहुल पंडित यांनी करोनाच्या नव्या लक्षणांची माहिती दिली आहे. ‘ऐकू येण्यात अडचणी, अतिशय जास्त अशक्तपणा, तोंड सुकणं, तोंडात लाळ कमी तयार होणं, बराच वेळ राहणारी डोकेदुखी, त्वचेवर चकत्या तयार होणं, डोळे येणं ही करोनाची नवी लक्षणं आहेत,’ असे पंडित यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच डॉ. राहुल पंडित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी करोनाच्या नव्या लक्षणांची माहिती देत सरकारला सतर्कतेचे आवाहन केले होते. ‘करोना पसरुन बराच कालावधी झाला आहे. आता करोनाची नवी लक्षणं समोर येत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची विशेष गरज आहे,’ असे पंडित म्हणाले.
करोनाची लागण झालेल्यांमध्ये बहिरेपणाची समस्या आलेल्यांची संख्या कमी असल्याचे आर. एन. कूपर रुग्णालयातील ईएनटी तज्ज्ञ डॉ. समीर भार्गव यांनी सांगितले. ‘नसांमध्ये सूज येत असल्याने तयार होत असलेल्या गाठींमुळे ऐकण्यात काहीशा अडचणी येत आहेत. मात्र बहिरेपणाच्या समस्या कमी रुग्णांना जाणवत आहेत,’ असे भार्गव म्हणाले.