सातारा – गेल्या महिनाभरात अतिवृष्टीमुळे त्रेधातिरपीट उडाली असतानाच सातारा शहरालगतच्या महत्वाच्या रस्त्यांवरील पुलांच्या वृध्दापकाळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसामुळे आणि अवजड वाहतुकीमुळे पुल पडतील, जीवितहानी होईल या भीतीने हे पूल बंद ठेवण्यात आले होते. मात्र पुलांच्या दुरुस्तीच्या कामाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. वाढे (ता. सातारा) येथील वेण्णा नदीवरील पुलावर तर वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. या पुलावर सध्या जीवघेणी सर्कस सुरु असून हा प्रकार थांबणार कधी? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.
गेल्या महिनाभरापासून वाढे पुलावर प्रवाशी जीव मुठीत घेवून प्रवास करत आहेत. वाढे फाटा येथे अवजड वाहनांसाठी बंदी असा फलक लावून बॅरेकेटस लावण्यात आले आहेत. तसेच याठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. असे असले तरी, दोन बस अथवा तत्सम वाहने समोरासमोर पुलावर येतात आणि वाहतूक ठप्प होते, ही बाब या पुलावर नित्याची झाली आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर या पुलावर पडलेले खड्डे आणि झालेला चिखल जेसीबीच्या साह्याने हटवण्यात आला. त्यानंतर मुरुम आणि माती टाकून पुलावरील वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र पावसाच्या रिपरिपीमुळे आणि वाहनांच्या वर्दळीमुळे या पुलावर खड्डे आणि चर पडत आहेत आणि वाहतूक ठप्प होत आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी जेसीबीच्या साह्याने पुन्हा लेव्हलींग केली जाते आणि माती टाकली जाते, हा खेळ दररोज सुरु आहे. पुलावरील माती उचल्यामुळे पूर्वीपेक्षा पुलाच्या फुटपाथची उंची वाढली असून रस्ता सुमारे तीन ते चार फुट खाली गेला आहे. पुलावरुन प्रवास करताना पुलाच्या संरक्षक कठड्याच्या पलीकडे काहीही दिसत नाही आणि पुलावरील खाचखळग्यांमुळे पुल कोसतो की काय? या भीतीने प्रवाशी जीव मुठीत धरत आहेत. त्यातच पुलावर वाहतूक कोंडी झाली की, दुचाकीस्वार, यामध्ये महिलाही दुचाकीवरुन पुलाच्या फुटपाथवरुन दुचाकी चालवत जीवघेणी कसरत करत आहेत.