शिवसेनेची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर घणाघाती टीका
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रत्येक पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्राचे सरकार निष्क्रिय असल्याची टीका कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. राहुल गांधीच्या याच विधानाला पकडत शिवसेनेने सवाल उपस्थित करत खडेबोल सुनावले आहे.
मधल्या काळात राहुल बॅंकॉक-पटाया भागात गेले व तेथे अदृश्य झाले. बॅंकॉक ही जागा काही प्रतिष्ठत राजकीय नेत्यांनी जाऊन आराम करण्याची नाही. त्यामुळे गांधी बॅंकॉकला नक्की कशासाठी गेले? यावर संपूर्ण देशातले वातावरण ढवळून निघाले. मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय व नपुंसकतेवर आधी बोलावे. सरकार निक्रिय ठरले असेल तर त्याचा निर्णय जनता जनार्दन घेईल,अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या. या सभांमध्ये राहुल यांनी राज्यातील युतीचे सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप केला होता. आरोपावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून राहुल गांधी यांना उलट सवाल केला आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या धक्क्यातून राहुल गांधी सावरले नाहीत व त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून कॉंग्रेस हा बिन मुंडक्याचा पक्ष म्हणून वावरत आहे.
कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व सोडून राहुल गांधी बॅंकॉक, युरोप वाऱ्या करतात व दुसऱ्यांना निक्रिय म्हणतात. कॉंग्रेसला गेल्या चार महिन्यांत अध्यक्ष निवडता आला नाही याचे कारण आधी सांगा. विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस महाराष्ट्रात इतका निक्रिय ठरला की, विरोधी पक्ष नेताच फौजफाटयासह भाजपात विलीन झाला. वरचे नेतृत्व निक्रिय असल्याचा हा परिणाम आहे,असा टोला शिवसेनेने लगावला आहे.