अभिनेत्री दया डोंगरे (पूर्वाश्रमीची दया मोडक) यांचा आणि माझा गेली सुमारे पन्नास वर्षांचा तरी परिचय आहेच. प्रथम पुण्यात त्यानंतर राजधानी दिल्लीत आणि त्यानंतर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत. राजधानी दिल्लीत, तर दया डोंगरे यांच्या बरोबर मी “नांदा सौख्यभरे’ या सई परांजपे यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या नाटकात त्यांचा नायक म्हणून भूमिका केलेली आहे. त्या नाटकाचे खुद्द दिललीत आणि बडोदा- मुंबईत असे आम्ही 4-5 प्रयोग तरी केलेले आहेत. या नाटकात मी व दया आणि सई परांजपे व अरुण जोगळेकर अशा दोन जोड्या होत्या आणि “रिव्ह्यू’ पद्धतीचं हे एक सुंदर नाटक होतं. पुढं या नाटकाचे व्यावसायिक प्रयोग करायचं ठरल्यानंतर माझ्याऐवजी का कुणास ठाऊक पण अभिनेते माधव वाटवे यांना घ्यायचं ठरलं आणि मला एकट्याला या नाटकातून बाजूला करण्यात आलं. अर्थात बाकीची सारी कलावंत मंडळी मात्र कायम ठेवण्यात आली. मी या नाटकाचे सुरुवातीचे प्रयोग आणि त्याच्या तालमींच्या निमित्ताने, त्याच प्रमाणं नाशिक इथं वास्तव करणारे बाळ भाटे या नाटककाराचं “याचसाठी केला होता अट्टहास’ या आम्ही दिल्लीत केलेल्या नाटकात आणि त्या नाटकाच्या तालमीसाठी लागणारा साधारण महिनाभराचा काळ असा माझा आणि दया डोंगरे यांचा परिचय राहिलेला आहे.
त्यानंतर मी दिल्ली आकाशवाणीमधली नोकरी सोडून मुंबई दूरदर्शनाच्या नोकरीत रूजू झालो. साधारण त्याच सुमारास दया तिचे पती शरद डोंगरे यांच्यासह वर्तमान, मुंबईत माहिम या ठिकाणी राहायला आली आणि दूरदर्शनच्या “गजरा’सह अनेक कार्यक्रमांत भाग घ्यायला लागली. त्या वेळेपासून एक व्यावसायिक अभिनेत्री म्हणून रंगमंदिरामधून आणि दूरदर्शन केंद्रात दयाची वारंवार गाठ पडे. त्यातही शरद डोंगरे हे एक अत्यंत “जंटलमन’ असे गृहस्थ असल्यानं त्यांच्याबरोबरचा परिचयही एकसारखा वाढतच गेला. कारण तेच अनेकदा दया डोंगरे यांना दूरदर्शन केंद्रावर सोडवण्यासाठी यायचे. त्या काळात दूरदर्शनचे लोकप्रिय सूत्रसंचालक म्हणून दया डोंगरे आणि सुप्रसिद्ध नाटककार सुरेश खरे यांची जोडी दूरदर्शन प्रेक्षकांच्या मनात मान्यता पावलेली होती. त्याच वेळी दया डोंगरे यांची “अखेरचा सवाल’, “बिऱ्हाड वाजलं’, “लेकुरे उदंड झाली,’ अशी काही नाटकं आणि दूरदर्शनचे काही कार्यक्रम खूप गाजले होते. त्या काळात अर्थातच खासगी वाहिन्या मुळी अस्तित्वातही नव्हत्या. मग आजच्या सारख्या मालिका तरी कुठून असणार!
मुळात दया डोंगरे या आमच्या सहकारी कलावतीला गायिका व्हायचं होतं. पण त्या झाल्या अभिनेत्री. त्यांनी राजधानी दिल्लीमधल्या इब्राहिम अतकाझी यांच्या “नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये प्रवेश घेतला होता आणि अभिनयाचे धडे गिरवायलाही सुरुवात केली होती. मात्र, त्यांचं नाट्याभिनयाचं शिक्षण प्रशिक्षणसुद्धा अर्धवटच राहीलं. कारण त्या विवाहबंधनात अडकल्या. शरद डोंगरे या अत्यंत स्मार्ट अशा युवकाबरोबर त्यांचा विवाह झाला. परंतु गायनाचं प्राथमिक शास्त्रीय संगीताचं शिक्षण त्यांनी नागेशबुवा खळीकर या गानगुरूंच्याकडे घेतलं होतं, परंतु त्यांनी अभिनय हेच आपलं क्षेत्र पक्कं केलं आणि एक “खाष्ट सासू’ ही आपली प्रतिमा कायम केली. त्यापूर्वी त्या रंगमंचावर मात्र नायिका म्हणून गाजल्या. उदाहरणार्थ, “लेकुरे उदंड झाली’ या नाटकातली त्यांची नायिका प्रेक्षकांच्या मनात कायम ठसली होती. “मायबाप’, “उंबरठा’, “आत्मविश्वास’, “नवरी मिळे नवऱ्याला’, “खट्याळ सासू नाठाळ सून’ अशा काही वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांत त्यांनी खाष्ट सासू आणि विनोदी व्यक्तिरेखाही उत्तम प्रकारे रंगवलेली आहे आणि आपण चांगल्या अभिनेत्री आहोत हे अनेकदा सिद्ध करून दिलं आहे. या चित्रपटांपैकी “खट्याळ सासू नाठाळ सून’ या चित्रपटातल्या भूमिकेसाठी तर त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. म्हणजे राजमान्यताही त्यांच्या पदरात पडली आहे.
चित्रपट, नाटक या माध्यमांबरोबरच त्यांनी चित्रवाणीच्या अनेक मालिकांमधून भूमिका केल्या. त्यात आजच्या काळात खूप गाजलेली “स्वामिनी’ ही मालिका ज्या प्रमाणं खूप लोकप्रिय आहे, तशी त्या काळात “स्वामी’ ही मालिका खूप लोकप्रिय होती. त्यात माधवराव पेशव्यांच्या आईची भूमिका म्हणजे गोपिकाबाईंची भूमिका, जी आजच्या मालिकेत ऐश्वर्या नारकर ही कलावती साकारते आहे, ती भूमिका त्या काळात दया डोंगरे करीत. ती त्यांची भूमिका खूप लोकप्रिय होती. अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी ठसा उमटवणाऱ्या भूमिका केल्या.
“माणसाला डंख मातीचा’ हे प्रा. वसंत कानेटकर यांचं त्या काळात खूप गाजलेलं नाटक. त्यात त्यांनी केलेली भूमिका बघून दस्तुरखुद्द प्रा. वसंत कानेटकर यांनी दयाताईंना त्या भूमिकेतल्या अभिनयाबद्दल त्यांचं वर्णन करताना म्हटलं होतं की, “लेखकाच्या मनात ज्या प्रकारची व्यक्तिरेखा होती हुबेहूब त्याच स्वरूपात तुम्ही “माणसाला डंख मातीचा’ या नाटकातली तुमची भूमिका करता याबद्दल मला आनंद वाटतो.’ प्रा. कानेटकरांचे हे प्रमाणपत्र म्हणजे मला मिळलेला खूप मोठा पुरस्कार आहे, असंच त्या मानीत. रंगमंच, चित्रपट, दूरदर्शन कार्यक्रम आणि मालिका यांच्या बरोबरीनंच त्या रंगमंचावर अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालनसुद्धा तितक्याच समर्थपणानं करीत आणि त्यामुळेच एक सशक्त-सृजनशील-कलावती म्हणून दया डोंगरे कायम स्मरणात राहतात.
(क्रमश:)
डॉ. विश्वास मेहेंदळे