मुंबई – विकास दर वाढता ठेवण्यासाठी नागरिक आणि उद्योगांना कर्जासाठी बॅंका भरपूर भांडवल उपलब्ध करतील. मात्र व्याजदरात कसलाही बदल झालेला नाही रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या पतधोरणात महागाई 5.2 टक्क्यांपर्यंत वाढून नंतर कमी होईल असे म्हटले आहे.
रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर चार टक्के तर रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के या पातळीवर कायम ठेवला आहे. एकीकडे भांडवल सुलभतेची हमी देत असतानाच रिझर्व्ह बॅंकेने रोख राखीव प्रमाण मार्च महिन्यापासून वाढ वाढविण्याचे ठरविले असून ते दोन टप्प्यात चार टक्के होणार आहे. सध्या हे प्रमाण तीन टक्के असल्यामुळे बॅंकांना कर्ज वितरणासाठी बराच निधी उपलब्ध होतो.
रिझर्व्ह बॅंकेने घेतलेला आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे रिटेल ग्राहकांना आता सरकारी रोख्याचे थेट खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार आहेत. मात्र याचा तपशील अजून उपलब्ध झालेला नाही.
काही वर्षापासून शेअर बाजाराच्या माध्यमातून ग्राहकांना हे राखे उपलब्ध होत होते. मात्र याला आतापर्यंत फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. आता नव्या यंत्रणेत ग्राहक प्रतिसाद देतील का हा चर्चेचा विषय होणार आहे. केंद्र सरकारने या वर्षी तूट कमी करण्यासाठी प्रचंड कर्ज घ्यायचे ठरविले आहे. या कर्ज उभारणीसाठी हा निर्णय उपयोगी ठरेल असे सरकारला आणि रिझर्व्ह बॅंकेला वाटते.
डिजिटल पेमेंटबाबत अहोरात्र तक्रार निवारण
भारतात डिजिटल पेमेंट व्यवहार वाढू लागले आहेत. त्याचबरोबर हे व्यवहार न होणे किंवा अपूर्ण होणे अशा प्रकारच्या तक्रारी वाढत आहेत. यासाठी अहोरात्र चालणारी एक तक्रार निवारण यंत्रणा रिझर्व्ह बॅंक विकसित करणार असल्याचे सांगण्यात आले. पुढील वर्षाचा विकासदर 10.5 टक्के राहील असे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात सरकारने पुढील वर्षाचा विकास दर 11 टक्के राहील असे सांगितले आहे.