नवी दिल्ली : क्रिकेटच्या 2000मधील मॅच फिक्सिंग प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इन्राहीमचा हात होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सहाय्यक आयुक्तांनी दिली. दिल्ली पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकात कार्यरत असणाऱ्या या अधिकाऱ्यानेच मॅच फिक्सिंग प्रकरणाचा भांडाफोड केला होता. ते म्हणाले, मी संजीव चावलाला हॉटेल ताज मानसिंग हॉटेलमध्ये मार्च 2000 मध्ये सर्व प्रथम पाहिले होते. मी त्यावेळी खंडणीच्या एका प्रकरणाचा तपास करत होतो. त्याची पाळेमुळे दुबईत होती. त्या तपासात मी संजीव चावला आणि आणि द. अफ्रिकेचा कर्णधार हॅन्सि क्रोन्जे यांचे संभाषण मी ऐकले होते. हे संभाषण आंतरराष्ट्रीय बुकी राजेश कालरा यांच्या फोनवर झाले होते.
एक दिवस मी कालराच्या मोटारीचा पाठलाग केला. त्यावेळी तो चावलाच्या मार्फत काही सीमकार्ड क्रोन्जेला देण्यासाठी जात होता. त्यावेळी मी पहिल्यांदा आणि शेवटचे चावलाला पाहिले होते. दिल्ली पोलिसांनी माझ्या तक्रारीवर आधारीत मॅच फिक्सिंगचा गुन्हा नोंदवला. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी सरकार होते. त्यात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू गुंतले असल्याचे लक्षात आल्यावर या सरकारने हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला, असेही सिंग यांनी सांगितले.
तुम्हाला चावलाला भेटायला 19 वर्षांनी आवडेल का? असे विचारता ते म्हणाले, हे सर्व दिल्ली पोलिसांवर अवलंबून आहे. मी आदेशाप्रमाणे काम करतो. पण, वयक्तीश: मला त्याला भेटायला आणि मॅच फिक्सिंगमध्ये अडकलेल्या भारतीय खेळाडूंची नावे जाणून घ्यायला आवडेल. दाऊदच्या मॅचफिक्सिंगमधील सहभागाबद्दल बोलताना ते म्हणाले, मी जे ऐकलं आणि तपासात समोर आलं त्यावरून या प्रकरणात दाउदचा त्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होता. एक बुकी त्याच्या सहभागाबाबत बोलत असल्याचे मी ऐकले आहे, असेही सिंग म्हणाले.
चावलाचे भारताकडे हस्तांतरण झाले आहे. त्यावर तो अधिक प्रकाशझोत टाकू शकेल. पोलिसांनी दाऊदच्या सहभागाचा उल्लेख केला होता. मात्र त्याचे पुरावे सादर करता आले नव्हते, असे त्यांनी सांगितले. चावलाला हस्तांतरीत केल्याने सज्जनांचा खेळ म्हणून ओळखला जाणारा हा खेळ स्वच्छ होण्यास मदत होईल. 19 वर्षापुर्वी काही प्रमाणात मी ते केले. गुन्हे शाखेचे उपायुक्त जी. रामगोपाल यांनी यांनी इंग्लंडमधून त्याचा ताबा मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले.