नानगाव येथील प्रचारसभेत राहुल कुल यांनी केले स्पष्ट
दौंड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड तालुक्यात दोन सभा घेतल्या असून दोन्ही सभांमध्ये मंत्रीपदाचे अश्वासन दिले आहे. मी मुळशीच्या पाण्यासाठी प्रयत्नशिल असून पुढे जर मला पाणी हवे का मंत्रिपद हवे, अशी विचारणा केल्यास मी पाण्याला महत्व देईल, असे सांगून गेल्या पाच वर्षात मी तालुक्यात विकासकामे केली असून कोणाची चाकरी करणारा आमदार हवा का, तालुक्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा आमदार हवा याचा निर्णय जनतेने घ्यावा, असा आवाहन महायुतीचे भाजपचे राहुल कुल यांनी केले.
नानगाव (ता. दौंड) येथे महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुल बोलत होते. आमदार कुल म्हणाले की, 2004च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विरोधकांनी दौंड सहकारी साखर कारखान्याचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करून तो कारखाना सुरू करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र, 2004ला पराभव झाल्यानंतर या कारखान्याचे खासगीकरण झाले. दुर्देव एवढे की यांनीच या व्यवहारात एजंटगिरी केली. त्यांनी केलेले हे पाप आता उघडे पडले आहे. 2009च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मला तिकीट दिले. पक्षानेच विरोधात काम केल्याने मला पराभवाला सामोरे जावे लागले.
तसेच तालुक्यातील विविध संस्थांवर माजी आमदार टिका करीत असून त्यांच्या ताब्यात असलेल्या संस्थांची शिफारस स्व.सुभाष कुल यांनीच केली आहे. बाजार समितीच्या हक्काची जागा या मंडळींनी विक्रीस काढली तर खरेदी विक्री संघ देशोधडीला लावला.
मी तालुक्यात बाहेरचे ठेकेदार आणले असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. मात्र कोणत्याही ठिकाणी मी भागिदार नाही. विरोधक व त्यांचे पुत्र अनेक ठिकाणच्या ठेकेदारीत भागीदार असून त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ते जर उघड केले तर याचं सगळंच अवघड होईल , – राहुल कुल, आमदार, दौंड.