नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद आणखी लांबणीवर गेला आहे. कारण आता या प्रकरणाची सुनावणी ही नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी बेळगाव सीमाप्रश्नी सुनावणी झाली. त्यावेळी कर्नाटकच्या वकिलांनी वेळ मागितल्याने पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.
न्यायमूर्ती जोसेफ यांच्या त्रीसदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने न्यायालयात वकील राकेश द्विवेदी आणि शिवाजीराव जाधव न्यायालयात उपस्थित होते. यावेळी न्यायालयाने निर्णय देताना या प्रकरणाची पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे म्हटले. खरंतर बेळगाव सीमाप्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तब्बल पाच वर्षांनी झालेल्या या सुनावणीकडे समस्त सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागलं होतं. आजच्या सुनावणीत महत्त्वाच्या बाबी समोर येतील अशी अपेक्षा होती. परंतु कर्नाटक सरकारच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितल्याने आता ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी दोन महिन्यांनी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये पार पडणार आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. 2004 साली हा दावा दाखल करण्यात आला आहे. विविध कारणांमुळे ही सुनावणी झाली नाही. मध्यंतरी ऑनलाईन सुनावणी होणार होती पण ती देखील झाली नाही. त्यानंरत आज दीर्घ कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली खरी, पण तीही लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्राच्या बाजूने ज्येष्ठ विधीज्ञ राजेश द्विवेदी आणि शिवाजीराव जाधव हे सुप्रीम कोर्टात उपस्थित होते.